काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर आशिष शेलारांचा कवितेतून खोचक टोला
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) काँग्रेसला (Congress) समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. सांगली (Sangli), भिवंडी (Bhiwandi) या काँग्रेसच्या हक्काच्या जागा मागण्यात वरिष्ठ नेते कमी पडले त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. यामुळे मविआची प्रतिमा जनतेच्या मनात मलीन होत चालली असून येत्या काळात निवडणुकीपर्यंत तरी मविआ टिकणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा भाजप नेत्यांनी पुरेपूर फायदा उचलला आहे. भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काँग्रेसच्या या नाराजीनाट्यावर कवितेतून खोचक टोला लगावला आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक कविता पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की,
'काँग्रेसची "अन्याय यात्रा" !
सांगली देता का सांगली..?
धुळ्यात ही नाराजीची ठिणगी पडली
उत्तर मुंबई का गळ्यात मारली?
मुंबईत काँग्रेस "न्याया"साठी मातोश्री समोर येऊन थांबली..!
काँग्रेसची अवस्था पाहून "न्यायपत्र" आतल्या आत रडलं
स्वतःच स्वतःची पाने फाडत चालू लागलं
मला न्याय देता का न्याय?
मला न्याय देता का न्याय?
असा टाहो फोडत..
"न्यायपत्रा" नेच काँग्रेसची "अन्याय यात्रा" काढली!'
आशिष शेलारांच्या या टीकेमुळे मविआतील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर मविआमध्ये आणखी काय काय उलथापालथी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.