Saturday, May 31, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

Sanjay Nirupam : खिचडी घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’ राऊतच!

Sanjay Nirupam : खिचडी घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’ राऊतच!

संजय निरुपमांनी थेट आकडेवारीच सांगितली


मुंबई : मुंबईतील खिचडी घोटाळ्याचा (Khichadi scam) खरा मास्टरमाइंड संजय राऊत (Sanjay Raut) हाच आहे. राऊतांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. यावेळी निरूपम यांनी घोटाळ्यात राऊतांनी त्यांची पत्नी, भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे घेतल्याचाही दावा निरूपम यांनी केला. यावेळी निरूपम यांनी अमोल किर्तीकरांसह ठाकरे गटावर (Thackeray Group) जोरदार हल्लाबोल केला.


मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना निरूपम म्हणाले की, आज ८ एप्रिल असून, उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तीकरांना खिचडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीने आज बोलवले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने दिलेला ठाकरे गटाचा उमेदवार आणि त्यांचे नेते किती मोठे चोर आहेत हे जनतेला कळले पाहिजे.


संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार असून, पत्राचाळ घोटाळ्यात त्यांनी पत्नीच्या नावे पैसे घेतल्याचेही निरुपम यांनी यावेळी सांगितले.


संजय राऊत यांची मुलगी निकिता हिच्या खात्यात ३ लाख ५० हजार, ५ लाख, तीन लाख अशी रक्कम जमा झाली. तसेच संदीप राऊत यांच्या खात्यात ५ लाख, १ लाख २५ हजार रुपये जमा झाले. सुजीत पाटकर यांच्या खात्यात १४ लाख, १४ लाख, १० लाख, १ लाख ९० हजार, १ लाख ९० हजार जमा झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.


खिचडी घोटाळ्यात ईडीने राऊतांना अटक केली पाहिजे असे म्हणत हा निर्दयी गुन्हा आहे. शिवसेना जी गरजूंना मदत करत होती अशा शिवसेनेचा झेंडा घेऊन फसवणूक करण्याचे काम राऊतांनी केले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारही खिचडी चोर असून ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली तेही चोर आहेत, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. अशा लोकांना पराभूत करा आणि त्यांना घरी बसवा, असे आवाहनही निरूपम यांनी केले आहे.

Comments
Add Comment