राज्यात अवकाळी पावसाचा इशारा!
विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट
मुंबई : देशासह राज्याच्या हवामानात (Weather Update) गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस असे बदलते वातावरण दिसून येते. यंदाचा उन्हाळा अधिक कडक असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशातच आता आज मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट
चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट दिला आहे.
काही भागात उन्हाच्या झळा
एकीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी, काही भागात उन्हाच्या झळा बसत आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आयएमडीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळी उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात पुढील २४ तास पारा ४० अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.