पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर घणाघात
पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendrta modi) विविध राज्यांत मॅरेथॉन सभा घेत आहेत. आज बिहारच्या नवादा येथे जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. मोदी यांनी दिलेली आश्वासनं बेकायदेशीर आहेत अशा विरोधकांच्या आरोपावर इंडिया आघाडीच्या नेत्यांचा संदर्भ देत, ‘माझी नियत साफ आहे आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे’ असे नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
जानेवारी महिन्यात अयोध्येत बांधलेल्या श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram mandir) भव्य सोहळा झाला. त्या सोहळ्यात अनेक पक्षांनी पाठ फिरवली होती. श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जाईल असे दिलेले आश्वासन पंतप्रधानांनी पूर्ण केले आहे. मंदिराचे काम थांबण्यासाठी काँग्रेस आणि राजदने वर्षानुवर्षे प्रयत्न केले. मात्र तरीही राममंदिराचे काम पूर्ण झालेच. ‘रामनवमी जवळ येत आहे, पाप करणाऱ्यांना विसरू नका. मोदींच्या गॅरंटीमुळेच त्यांची दुकाने बंद होत आहेत, हे त्यांना माहित असल्यामुळेच ते लोक मोदींच्या गॅरंटीला विरोध करत आहेत’, असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला.
इंडिया आघाडी म्हणजे देशद्रोही शक्तीचे घर
इंडिया आघाडीचे लोक भारताचे विभाजन करण्याची भाषा बोलतात. काँग्रेस आणि आरजेडीला एकही मत मिळण्याचा अधिकार नाही. या लोकांना सत्तेचे व्यसन लागले आहे. सत्तेतून बाहेर पडताच ते पाण्यातल्या माशाप्रमाणे तडफड करतात, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.