३०० कोटी रुपयांची कमाई नोंदवून ४६.२६ लाख प्रकरणांचा शोध
मुंबई (प्रतिनिधी): विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एकूण ४६.२६ लाख प्रकरणे यामाध्यमातून समोर आली असून त्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. या कारवाईमुळे मध्य रेल्वेने सर्व विभागात आघाडी घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मध्य रेल्वेने २६५.९७ कोटी महसुलाच्या बाबतीत या वर्षीचे लक्ष्य १२.८० टक्केने ओलांडले आहे. मध्य रेल्वेने एकूण ४२.६३ लाख प्रकरणांमध्ये ८.३८ टक्केचे लक्ष्य पार केले असून प्रकरण आणि कमाईच्या बाबतीत सर्व विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
मुंबई विभागात २०.५६ लाख प्रकरणांमधून ११५.२९ कोटी रुपये प्राप्त केले. भुसावळ विभागातील ८.३४ लाख प्रकरणांमधून ६६.३३ कोटी रुपये प्राप्त केले. नागपूर विभागात ५.७० लाख प्रकरणांमधून ३४.५२ कोटी रुपये प्राप्त केले.
सोलापूर विभागातील ५.४४ लाख प्रकरणांमधून ३४.७४ कोटी रुपये प्राप्त केले. पुणे विभाग ३.७४ लाख प्रकरणांमधून २८.१५ कोटी रुपये प्राप्त केले. मध्य रेल्वेकडे दोन महिला वरिष्ठ तिकीट परीक्षकाचा समावेश असून २२ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांनी तिकीट तपासणीच्या उत्पन्नात वैयक्तिकरित्या १ कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे.