
मुंबई : भारतात लोकसभा निवडणूक (loksabha election) तसेच इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) चा थरार सुरु आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे सामनेही भारतात होणार असून दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रकाची घोषणा केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून या वेळापत्रकात बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील १७ एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याच्या शेड्यूलमध्ये बदल होऊ शकतो. रामनवमीमुळे केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा वार्षिक उत्सव देशभरातील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. त्यामुळे या दिवशी सामन्याला पुरेशी सुरक्षा देण्याबाबत प्रशासन गोंधळात आहे. या महिन्यापासून देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत असून या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने सामना पुढे ढकलण्याचा पर्यायही ठेवला आहे.
बीसीसीआय आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) कोलकाता पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत. या प्रकरणी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु बीसीसीआयने संभाव्य बदलांबाबत फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टर या दोघांनाही संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल यूएईमध्ये होऊ शकते, असे मानले जात होते, परंतु बीसीसीआयने हे सर्व अंदाज फेटाळून लावले होते. मात्र, आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यात केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामना पुन्हा नियोजित करावा लागेल. पोलिस प्रशासनाशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.