Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीअलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातही होणार गंभीर आजारांवर उपचार

अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातही होणार गंभीर आजारांवर उपचार

वर्षभरात २ हजार २९९ गंभीर, १ हजार ३२६ सामान्य रुग्णांना दिले जीवनदान

अलिबाग : कॅन्सर, आतड्यांचे आजार, पित्ताशय यासह गंभीर आजार असलेल्या रुग्णाला यापूर्वी खाजगी रुग्णालयात किंवा मुंबईला जाऊन शस्त्रक्रिया करून उपचार करावे लागत होते. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक भार सोसावा लागत होता. मात्र जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा आता सक्षम झाली असल्याने गंभीर, तसेच सामान्य शस्त्रक्रिया निष्णात डॉक्टर रुग्णालयातच करू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्षभरात २ हजार २९९ गंभीर, तर १ हजार ३२६ सामान्य अशा ३ हजार ६२५ यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवनदान देण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत होऊ लागल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अलिबाग येथे २७२ बेडचे जिल्हा आंतररुग्ण रुग्णालय आहे. विविध आजारांवर याठिकाणी रुग्णांना उपचार मिळतात. जिल्ह्यातून हजारो रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. सामान्य आजाराप्रमाणे गंभीर आजार असणारे रुग्णही उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्षही आहे. मात्र कॅन्सर, मुतखडा, पित्ताशय, आतड्यांचा आजार यासारख्या गंभीर आजारावर डॉक्टर आणि योग्य यंत्रणा नसल्याने शस्त्रक्रिया करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णाला खाजगी किंवा मुंबईत शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता.

जिल्हा रुग्णालयात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात सामान्य प्रकारात २२८ गंभीर, ४५५ सामान्य, स्त्री रोगाच्या गंभीर १९३७, सामान्य १४२, तर अर्थो प्रकारात १३४ गंभीर, ७२९ सामान्य शस्त्रक्रिया डॉक्टरांनी करून नवे जीवनदान रुग्णांना दिले आहे. जिल्हा रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रिया या मोफत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात न जाता, जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करता येणार आहेत.

दरम्यान, खाजगी तसेच मुंबईत शस्त्रक्रिया करण्यास जाणे हे सर्वसामान्य रुग्णाला खर्चिक होत होते. मात्र तरीही अनेकजण उसनवारी करून आपल्या आजारावर उपचार करीत होते. अलिबाग जिल्हा रुग्णालयात मधल्या काळात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा होती, तसेच शस्त्रक्रिया करणारी यंत्रणाही अपुरी, त्यात निष्णात डॉक्टर नसल्याने आरोग्य यंत्रणा ढासळली होती. प्राथमिक उपचार पद्धत मधल्या काळात रुग्णालयात मिळत होती, तर गंभीर आजारावर ही शस्त्रक्रिया होत नव्हत्या. मात्र आता विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्षभरात गंभीर आणि सामान्य अशा ३ हजार ६२५ यशस्वी शस्त्रक्रिया निष्णात डॉक्टरांनी केल्या आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये जाऊन किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करण्याचा खर्च टळला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -