Saturday, August 9, 2025

कल्याणमधील घनकचरा प्रकल्पाला प्रचंड आग; सर्वत्र धुराचे लोट

कल्याणमधील घनकचरा प्रकल्पाला प्रचंड आग; सर्वत्र धुराचे लोट

कल्याण : कल्याण पश्चिम बारावे येथील घनकचरा प्रकल्पाला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या ठिकाणी कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा पद्धतीने विलगीकरण केले जाते. मात्र कडक उन्हाच्या झळांमुळे हा कचरा वाळून गेला आहे. या वाळलेल्या कचऱ्याला आज सकाळी भीषण आग लागली असता सर्व कचरा आगीमध्ये जळून खाक झाला. वाऱ्याचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते तर सर्वत्र धुराचे लोटदेखील पसरले होते.


कचरा केंद्र परिसरात कर्मचारी नसल्याने जीवित हानी झाली नाही. आगीच्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या. बारावी परिसरातील अनेक उंच गृह संकुलांमध्ये धूर पसरल्याने रहिवासी अस्वस्थ होते. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली पालिका अग्निशन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी अग्निशन दल पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.


या कचरा केंद्रावर कल्याण परिसरातील कचरा पालिकेकडून जमा केला जातो. गेल्यावर्षी या कचरा केंद्राला भीषण आग लागली होती. कचऱ्यामधील विविध प्रकारचे घटक उन्हामुळे तप्त होतात. त्यामधून मिथेन वायू तयार होऊन अशा आगी लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वेळा अज्ञात इसमांकडून कचऱ्यावर पेटती काडी टाकली जाते. त्यामुळेही आगीच्या घटना घडल्या आहेत असं यापूर्वीही सांगण्यात आलं आहे.


Comments
Add Comment