लोकसभा निवडणुकीत आपल्या संभाव्य पराभवाच्या धास्तीने इंडिया आघाडी हताश झाली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपावर असभ्य भाषेत टीका सुरू केली आहे. पण इंडिया आघाडीत सामील असलेल्या आणि नसलेल्याही पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आकाशपाताळ एक का करत आहेत, याचे उत्तर शोधू गेले असता असे दिसते की, या सर्वच पक्षांना आपल्या नातेवाइकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ द्यायची नाहीत. इतक्या हेतूनेच ते आता इंडिया आघाडीत सामील झाले आहेत. कम्युनिस्ट पक्ष तर साधनशुचितेच्या गप्पा मारत असतो. त्या पक्षाचे नेते उजव्या गटांना म्हणजे भाजपा वगैरेंना नेहमीच तत्त्वज्ञान शिकवत असतात. पण कम्युनिस्ट मार्क्सिस्ट लेनिनवादी पक्षाचे नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या कन्या वीणा यांच्यावर प्रवर्तन निदेशालयाने म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
वीणा विजयन यांची एक एक्झॅलाजिक सोल्युशन या नावाची कंपनी आहे. या कंपनीला कोची मिनरल्स अँड रूटाईल लिमिटेडने १ कोटी ७२ लाख रुपयांचे पेमेंट केले आणि त्या बदल्यात वीणा यांच्या कंपनीने कसलीही सेवा कोची मिनरल्सला दिली नाही. आता हे प्रकरण ईडीने आपल्या हातात घेतले आहे. विजयन यांच्या कन्येचा हा एक प्रकारे भ्रष्टाचारच आहे आणि करण्यासाठी विजयन यांच्या पदाचा गैरवापर केला गेला, हे उघड आहे. विजयन ज्या कम्युनिस्ट मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचे नेते आहेत. त्या पक्षाचा तत्वज्ञ लेनिन तर कामगारांचा घाम गाळण्याअगोदरच त्यांना मजुरीचे पैसे मिळाले पाहिजेत, असे सांगायचा. पण त्याच पक्षाच्या नेत्याची कन्या एका कंपनीला पैसे घेऊन सेवा देत नाही, हा विरोधाभास आहे. नुसते इतकेच नव्हे तर सीएमआरएलचे राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंध उघड झाले आहेत. सीएमआरएलचे अनेक व्यवहार संशयास्पद आहेत, असा दावा सरकारी वकिलांनीच केला होता. याच सीएमआरएलमध्ये केरळच्या स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची १४ टक्के भागीदारी आहे. याचा अर्थ या प्रकाराचे मूळ सरकारपर्यंत जाते आणि मुख्यमंत्री विजयन यांच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे जातात.
कम्युनिस्ट पक्षाचे नेते स्वतःला स्वच्छ समजतात. पण तसे ते नाहीत, हे या प्रकरणाने उघड झाले आहे. तिकडे आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे तर तुरुंगात आहेत. याचा अर्थ इतकाच आहे की, इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात आणि प्रत्यक्षात यांचाच त्यात हात असतो. पंतप्रधान मोदी यांना हटवण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते एकत्र आले आहेत. त्यांचा मूळ हेतू लपून राहिलेला नाही. प्रत्येक नेता कोणत्या न कोणत्या प्रकरणात अडकलेला आहे. मोदी यांच्याविरोधात एकत्र येण्याचे नक्की कारण हे आहे की, आपल्या नातेवाइकांना वाचवायचे आहे. विजयन यांचे पायही मातीचेच आहेत हे यामुळे सिद्ध झाले आहे. २०१६-१७ या कालावधीत एकूण दहा कंपन्यांनी वीणा यांच्या कंपनीशी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. वीणा यांच्या कंपनीत इतका रस दाखवण्याचे कारण त्यांच्या वडिलांचे मुख्यमंत्रीपद हेच असणार, हे उघड आहे.
कम्युनिस्टही धुतल्या तांदळासारखे नसतात आणि हेच नेते भाजपावर आरोप करत असतात. यामुळे डाव्या पक्षांचा खरा चेहरा उघड झाला आहे. या प्रकरणी प्राप्तीकर खात्यातर्फेही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गंभीर गुन्हा आणि सार्वजनिक हिताचा प्रश्न आहे, असा केरळच्या सरकारी वकिलांचा दावा आहे. केरळमधील लोकांचे पैसे लुबाडून वीणा यांच्या कंपनीने सरकारची फसवणूक केली, असाही याचा अर्थ होतो. तिकडे अरविंद केजरीवाल हे सर्वाधिक भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गोत्यात आले आहेत. मद्य घोटाळ्यात त्यांचे नाव आहे आणि त्यांच्या या घोटाळ्यात आणखी एक मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांचाही समावेश आहे. याचा अर्थ इतकाच की, हे सारे नेते आपल्या भ्रष्टाचार प्रकरणामधून सुटण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांची जी मोदी यांची हुकूमशाहीविरोधात ओरड सुरू आहे, ती निव्वळ आपल्या नातेवाइकांना भ्रष्टाराचाराच्या गुन्ह्यांमधून बाहेर काढण्यासाठी आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांची ही काळी बाजू आता समोर आली आहे. त्यामुळे मोदी विरोधी त्यांच्या प्रचारातील हवा गेली आहे. ईडी सूडबुद्धीने कारवाई करत आहे, हा त्यांचा आरोप निखालस खोटा आणि स्वतःच्या नातेवाइकांना खटल्यापासून वाचवण्यासाठीच आहे. इंडिया आघाडीत एकही नेता असा नाही की ज्याचे सार्वजनिक चारित्र्य भ्रष्टाचारापासून अलिप्त आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आणि ज्यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी करण्यात आली आहे, ते लालू यादव हे मोदी यांना परिवार नाही, अशी नस्ती उठाठेव करतात. मोदी यांचे कुठल्याही प्रकरणात नाव नाही, त्यामुळे इंडिया आघाडीचा जळफळाट होत आहे.
इतके दिवस राजकारणात साधनशुचितेच्या गप्पा मारणारे कम्युनिस्ट नेतेही या भ्रष्टाचाराच्या दलदलीत आहेत. त्यांनाही कन्याप्रेम भोवले आहे. या नेत्यांनी आपल्या नातेवाइकांना वाचवण्यासाठी आघ़ाडी तयार केली आहे. मोदी आणि शहा यांच्याविरोधात गरळ ओकण्यास आताच का सुरुवात केली आहे हे यावरून समजते. इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता स्वतःच्या किंवा नातेवाइकाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतला आहे. त्यामुळे त्यांना मोदी यांना हटवायचे आहे. खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी या नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर आहेत. इतर अनेक नेत्यांबाबत हेच सांगता येईल. येत्या निवडणुकीत म्हणूनच ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…