मुंबई : महापालिकेचा अधिकारी वडापावची गाडी लावू देत नाही, म्हणून एका व्यक्तीने मंत्रालयाच्या इमारतीवरुन खाली उडी मारली. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवर हा व्यक्ती पडला असून पोलिसांनी त्याला बाहेर काढले. अरविंद बंगेरा असे उडी मारलेल्या नागरिकाचे नाव असून तो बोरीवलीचा रहिवासी आहे. महापालिकेचे अधिकारी त्रास देतात म्हणून हे कृत्य केले असल्याचे बंगेरा यांनी म्हटले आहे.
याआधीही मंत्रालयावरुन उडी मारत अनेकांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय, आजवर मंत्रालयावरुन उडी मारत अनेकांनी जीवन देखील संपवले आहे. त्यामुळे मंत्रालयात जाळी लावण्यात आली आहे. जेणेकरुन असे प्रकार टाळले जातील. मात्र, जाळी लावल्यानंतरही अनेकजण सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तशाच पद्धतीने उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात.