
मुंबई: मुंबईने शानदार कामगिरी करताना रणजी ट्रॉफी २०२३-२४चा(ranji trophy) खिताब आपल्या नावे केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या फायनल सामन्यात मुंबईने विदर्भला १६९ धावांनी हरवले. ५३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भला दुसऱ्या डावात ३६८ धावा करता आल्या. मुंबईने रेकॉर्डब्रेक ४२व्यांदा रणजी ट्रॉफीचा खिताब आपल्या नावे केला. तर विदर्भचे तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न तुटले.
मुंबईने ८ वर्षांनी रणजी ट्रॉफीचे जेतेपद मिळवले. शेवटचा खिताब त्यांनी २०१५-१६च्या हंगामात सौराष्ट्रला हरवत जिंकला होता.
वाडकरची शतकी खेळी व्यर्थ
अखेरच्या सामन्यात ५३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भने एका वेळेस चार बाद १३३ धावा केल्या होत्या. येथून करूण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. मुशीर खानने नायरला बाद करत ही भागीदारी तोडली. करूण नायर बाद झाल्यानंतर अक्षय वाडकर आण हर्ष दुबेने मिळून सहाव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली.
या भागीदारीमुळे विदर्भचा संघ सामन्यात परतला. पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात वाडकर-दुबेने कोणताही विकेट पडू दिला नाही. दरम्यान, दुसऱ्या सत्रात मुंबईच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत विदर्भचा स्कोर ३६८ धावांवर रोखला. वाडकरने १०२ आणि हर्ष दुबेने ६५ धावा केल्या. तनुष कोटियानने मुंबईसाठी चार आणि मुशीर खानने दोन विकेट घेतल्या.