निकाल वेळेवर लागणार की नाही?
मुंबई : सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (SSC -HSC Board Exam) सुरु असून अर्धे पेपर झाले आहेत. त्यामुळे त्या उत्तरपत्रिकांची तपासणी होणं अपेक्षित आहे. मात्र, विभागीय शिक्षण मंडळात (Divisional Education Board) काल सायंकाळपर्यंत ५५० उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत आल्याचे पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागात (Chhatrapati Sambhaji Nagar Division) हे प्रमाण अधिक आहे. याचं कारण म्हणजे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील ५९ हजार अंशत: अनुदानित शिक्षकांनी (Teacher) थेट दहावी, बारावी उत्तरपत्रिका (Answer Sheet) तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे आता निकाल वेळेवर लागणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची १ मार्चपासून परीक्षा सुरु झाली. असे असतानाच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंशत: अनुदानित शिक्षकांनी दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. अनेक शिक्षकांनी तपासणीसाठी पाठवलेले पेपरचे गठ्ठे परत पाठवले आहेत. त्यामुळे आता दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लागणार का? अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे. तर, यावर आता शिक्षण विभाग कसा तोडगा काढणार हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे.
थेट कारवाई होणार, मंडळ मान्यताही रद्द करणार…
दरम्यान, शिक्षकांच्या या भूमिकेवरून शिक्षण विभागाने देखील कडक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. तपासणीविना उत्तरपत्रिका परत आल्यास कारवाईचा इशारा देणार पत्र शिक्षण मंडळाने मुख्याध्यापक व प्राचार्यांना पाठवले आहे. ज्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालय उत्तरपत्रिका न तपासता परत पाठवणार आहेत, त्यांच्या महाविद्यालयाचा दहावी-बारावीचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे. सोबतच मंडळ मान्यताही रद्द करण्यात येईल, असा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे.