भाजपा आमदार नितेश राणे यांची सडकून टीका
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर खरे प्रेम असेल तर वंचित पक्षाला ते मागत असलेल्या १२ जागा द्या
भाजप नाही तर आदित्य ठाकरे तडीपार होणार
मोदी साहेबांनी केलेले ५० प्रकल्प विनायक राऊतला मी स्वखर्चाने फिरवून दाखवतो
कणकवली : उबाठा आणि शरद पवार गट महाविकास आघाडीत लढणार नाहीत. काँग्रेसला एकटे पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. इंडिया आघाडीत काय काय चालले आहे त्याचे लवकरच चित्र पाहायला मिळेल, असा दावा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. तसेच उबाठा आणि शरद पवार गट काँग्रेससह प्रकाश आंबेडकर यांना देखिल धोका देणार असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांबद्दल उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गटाला काडीचेही प्रेम नाही. फक्त कॅमेरा समोर ईलुईलू करून ते प्रकाश आंबेडकर यांना चॉकलेट दाखवण्याचे काम करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर खरे प्रेम असेल तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ते मागत असलेल्या बारा जागा द्या, असे आव्हान यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले.
कणकवलीत ओमगणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांवर बोलले की दिवसभर चर्चेत राहायला मिळतं, ही संजय राऊतची सवय झाली आहे. त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदमुळे त्यांचे मित्रपक्षांचे नेते सोडून जात आहेत. ज्या व्यक्तीला स्वतःचं घर सांभाळता आलं नाही. पक्ष गेला. त्या अतिरेक्यांसोबत संबंध असलेल्या संजय राऊतने मोदींजींना सल्ले देवू नयेत. उद्धव ठाकरेंनी दिलेले किती शब्द पूर्ण केलेत? ते आधी सांगा? कोकणातील शेतकऱ्यांना किती सबसिडी, नुकसान भरपाई मिळाली ते सांगा? बांधावर जावून शेतकऱ्यांना काय काय सांगितले होते ते आठवा?
कर्जत येथील फार्महाऊस, सुशांत सिंग राजपूत बाबत प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला रस्त्यात अटक केली गेली, असा आरोप देखिल नितेश राणे यांनी केला आहे.
आंदोलन जीवींचा दुसरा भाऊ म्हणजे संजय राऊत आहे. त्यांना त्याच्यातील कमिशन येत असावे म्हणून त्याची तशी भाषा आहे. संजय राऊतने तयारी दाखवावी, मी मोदींनी सुरू केलेले देशातील ५० प्रकल्प फिरवून दाखवतो. त्यासाठी लागणारा सगळा खर्च माझा असेल. माझं आव्हान स्वीकारायला तयार व्हा आणि हे प्रकल्प दाखविले की मोदी है तो मुमकिन है, हे मान्य करा. संजय राऊतने देशाच्या न्याय व्यवस्थेवर टिपणी करू नये. राऊतची भूमिका ही नक्षलची भूमिका आहे, अशी टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली.
दुसऱ्यांच्या घरातल्या बारशाला जाऊन वडापाव खायचं, ही राऊतची सवय आहे. नितीन गडकरी यांचे सोडा, तुम्ही तुमच्या जुन्या सैनिकांना किती न्याय दिला? असा सवाल करत श्रीधर पाटणकर यांच्याकडे १० हजार कोटी कसे आले? उद्धव ठाकरे हे दिशा सालीयन व सुशांतसिंगच्या आईवडिलांना भेटणार आहेत का? असा सवाल एका प्रश्नावर बोलताना त्यांनी केला.
जरांगे पाटील यांच्यावर बोलताना ते म्हणाले, त्यांना मराठा समाज गांभीर्याने घेत नाही. जरांगे समाजाबद्धल कमी पण राजकारण जास्त बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. मराठा समाजाला न्याय फडणवीस यांनीच दिला असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले.
विनायक राऊतला पडण्याची एवढी घाई लागली असेल, देवीकडे साकडे घातले असेल, तर त्यांनी बॅग भरून ठेवावी. गुलाबराव पाटील बरोबर बोलले, भाजपा तडीपार होणार नाही तर आदित्य ठाकरे तडीपार होणार आहे. त्यामुळेच आईला घेऊन इकडे तिकडे पायधरत फिरत आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.