लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आता जेमतेम दोन महिन्यांनी संपन्न होणार आहेत. आठ-दहा दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुका जवळ आल्यावर अनेक वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच खासगी संस्था जनसामान्यांच्या मनाचा कल घेत निवडणूक निकालाबाबतचे संभाव्य अंदाज या सर्व्हेमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर व्यक्त करत असतात. गेल्या दोन-अडीच दशकांहून अधिक काळ हा प्रकार चालत आलेला आहे.
गृहविभागही आपल्या माध्यमातून अंदाज व्यक्त करत असतो. त्यामुळे प्रत्येक शासकीय, बिगर शासकीय यंत्रणा, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, खासगी संस्थांनी व्यक्त केलेल्या निवडणूक पूर्व चाचण्यांतील अभिप्राय, अंदाज यामधून जनसामान्यांचा कल प्रत्येक राजकीय संघटनांना, पक्षाला, नेतृत्वाला माहिती पडतो. सर्व्हे शंभर टक्के बरोबर नसले तरी ८५ ते ९० टक्के खरे ठरत असल्याचे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पाहावयास मिळालेले आहेत. फार फार जागांच्या बाबतीत पाच-दहाच्या फरकाने अंदाज इकडे-तिकडे होत असतात. दोन महिन्यांनी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अंदाज, सर्व्हे वृत्तवाहिन्यांनी गेल्या काही दिवसांपासून जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व्हेतून देशामध्ये तिसऱ्यांदा भाजपाचेच सरकार येणार आणि देशातील मतदार हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणार, विरोधकांना या निवडणुकीत फारसे यश मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व्हेचा अंदाज भाजपा व मित्र पक्षांमध्ये उत्साह निर्माण करणारा अाहे. २०१४ पासून लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण झालेली भाजपाची लाट भारतीय मतदारांच्या मनावर आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या कारभाराला, भ्रष्टाचारी राजवटीला खऱ्या अर्थांने भारतीय मतदार कंटाळले होते; परंतु सक्षम पर्याय नसल्याने त्यांना काँग्रेसलाच पसंती द्यावी लागत होती; परंतु २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने हे चित्र बदलले. २०१४ साली ‘अब की बार, मोदी सरकार’, ‘अच्छे दिन आयेंगे’ या दोनच घोषणांनी समस्त भारत देश भारावून गेला होता. भाजपाच्या यशात या दोन घोषवाक्यांचा सिंहाचा वाटा होता, हे भाजपाच्याच लोकांना नाही, तर विरोधकांनाही नाकारता येणार नाही. अर्थात आपल्या देशात हे प्रथमच घडले आहे, अशातला भाग नाही. देशाचे कणखर व पोलादी नेतृत्व असलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढताना तत्कालीन परिस्थितीत ‘गरिबी हटाव’ची घोषणा देत मतदारांना भुरळ पाडत काँग्रेसने देशाची सत्ता संपादन केली होती.
सतत सत्तेमध्ये राहणाऱ्यांच्या विरोधात नकळत जनमत तयार होते आणि सत्ताधाऱ्यांना लोकप्रियतेला ओहोटी लागून विरोधकांना वातावरण अनुकूल होत असते. भारतीय लोकशाहीमध्ये केंद्र पातळीवर तसेच विविध राज्यांमध्ये हे पाहावयास मिळालेले आहे. पण या समीकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपवाद ठरले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जिंकत परत सत्ता मिळविली. २०१४ सालानंतरच्या दहा वर्षांतील देश कारभाराचा आढावा पाहिल्यास मोदींच्या लोकप्रियतेला कोठेही ओहोटी लागलेली नसून, लोकप्रियतेचा आलेख उंचावतच चालला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पक्ष संघटनेला जे ‘अच्छे दिन’ आले आहेत.
सलग तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान नेहरूनंतर केवळ मोदी यांनाच प्राप्त होणार आहे. नेहरूंनी १७ वर्षे पंतप्रधानपदावरून देशाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. २०१४ पूर्वीचा आपला देश आणि २०१४ नंतर मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांमध्ये वाटचाल करणारा भारत देश यामध्ये जमीन-आसमानचा फरक पडला आहे. जागतिक पातळीवर कोणत्या गटात न जाता केवळ तटस्थ राहणारा देश ही आजवरची आपल्या देशाची प्रतिमा होती. पण मोदींच्या नेतृत्वाखाली तटस्थ राहणारा नाही, तर जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारा देश ही नवी ओळख आपल्या देशाची निर्माण झालेली आहे. पूर्वी आपल्या शेजारचे लिंबू-टिंबू देशही आपल्यावर गुरगुरण्याची आगळीक करत असायचे; परंतु मोदी पर्वानंतर शेजारील राष्ट्र तर सोडाच, पण जगाच्या कानाकोपऱ्यांतील देशांमध्येही भारताची एक आदरयुक्त प्रतिमा निर्माण झालेली आहे. वैज्ञानिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आर्थिक, लष्करी सर्वच बाबतीत आपला देश मोदींच्या नेतृत्वाखाली प्रगती करत असतानाच एक हिंदू देश, हिंदूंचा देश अशी भारताची प्रतिमा अलीकडच्या काळात जागतिक पातळीवर भारताची निर्माण झालेली आहे. काँग्रेसने आपल्या राजवटीत बहुसंख्याक असणाऱ्या हिंदूंना डावलून अल्पसंख्याकांना धार्जिणे असणारे राजकारण केल्याने हिंदुस्थानच्या भूमीवर हिंदूंनाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता; परंतु २०१४ नंतर या चित्रामध्ये बदल झाला आहे.
पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माण झाले आहे. पाण्याखाली जाऊन द्वारकेचे दर्शन घेण्याचा दिवस आता समीप आला आहे. मोदींमुळे सर्वच क्षेत्रांत देशाचा कायापालट होत असल्याची भारतवासीयांना जाणीव आहे. त्यांनी २०१४ नंतर देशाचा होणारा विकास व जागतिक पातळीवर बदलत असलेली भारताची प्रतिमा त्यांनी जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे. त्यामुळे २०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारही पंतप्रधान मोदींच्या कार्यावर मतदानातून पोहोचपावती देण्यास नक्कीच उत्सुक असणार व याचेच प्रतिबिंब जनमत चाचण्यांच्या कलातून निर्माण झालेल्या सर्व्हेमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…