
काय आहे कारण?
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नमो रोजगार मेळाव्याच्या (Namo Rojgar Melava) निमित्ताने बारामतीमध्ये (Baramati) येणार आहेत. यावेळेस शरद पवारांनी (Sharad Pawar) तिघांनाही जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, पण व्यस्ततेच्या कारणामुळे आपल्याला हे शक्य होणार नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निमंत्रण नाकारलं आहे. त्या संबंधित त्यांनी एक पत्रही शरद पवारांना लिहिलं असून त्यांचे आभारही मानले आहेत.
शनिवारी, २ मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिलं होतं. पण व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे सांगितलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. पुनश्चः एकदा आपले आभार', असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.