Saturday, June 7, 2025

Mumbai Water cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

Mumbai Water cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

१ मार्चपासून १० टक्के पाणीकपात होण्याची शक्यता


मुंबई : मार्च महिन्यापासून मुंबईकरांना (Mumbaikars) १० टक्के पाणीकपातीला (Water cut) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ ४३ टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत मुंबई महापालिकेच्या जलखात्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर आयुक्तांकडून शिक्कामोर्तब झाल्यास ऐन उन्हाळ्याच मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.


पालिका आयुक्तांकडून अद्याप प्रस्तावावर निर्णय देण्यात आलेला नाही. उन्हाळ्यात मुंबईतला पाणीपुरवठा अपुरा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (BMC) राज्य सरकारकडे (Maharashtra Government) पत्राद्वारे केली होती. यासंबंधी २९ फेब्रुवारी पर्यंत उत्तर कळवण्याची विनंती केली होती. मात्र, याबाबत अद्याप जलसंधारण खात्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही, त्यामुळे जलखात्याकडून इतर पर्यायी मार्गांचा शोध सुरु आहे.



तीन वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा


एखाद्या वर्षी पाणीसाठा कमी झाला तर राखीव साठ्यातून पाणी मिळावे याकरीता पालिका प्रशासन मे महिन्याच्या आसपास राज्य सरकारला पत्र पाठवते. यंदा मात्र ही वेळ मार्च महिन्यातच आली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून केवळ ४३ टक्के पाणीसाठा उरला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये तो ५४.४१ टक्के इतका होता तर २०२२ मध्ये ५६.८६ टक्के इतका होता. यंदा ही टक्केवारी फारच खाली घसरली आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा