रांची: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये सुरू आहे. सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान मिळाले आहे. याचा पाठलाग करताना भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत बिनबाद ४० धावा केल्या आहेत. भारताचे सलामीवीर यशस्वी जायसवाल १६ आणि कर्णधार रोहित शर्मा २४ धावांवर नाबाद आहेत. आज भारतासाठी विजयासाठी १५२ धावा हव्या आहेत तर त्यांच्याकडे १० विकेट बाकी आहेत.
या भागीदारीने बदलला गेम
भारतीय संघाने या कसोटी सामन्यात ज्या पद्धतीने पुनरागमन केले आहे ते कौतुकास्पद आहे. या पुनरागमनामध्ये ७६ धावांची भागीदारी महत्त्वाची आहे. ही भागीदारी पहिल्या डावात कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांच्यात आठव्या विकेटसाठी झाली होती. जर ही भागीदारी झाली नसती तर इंग्लंडला पहिल्या डावात सव्वाशेपेक्षा जास्त धावांची आघाडी मिळाली असती. कुलदीप-जुरेल यांच्या भागीदारीमुळे भारताला ३०० धावांचा आकडा पार करण्यात यश मिळाले आणि इंग्लंडला केवळ ४६ धावांची आघाडी मिळाली.
कुलदीप यादव मूळत: गोलंदाज आहे. मात्र रांचीच्या कठीण पिचवर त्याने हार मानली नाही आणि डटून इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. कुलदीपने दोन चौकारांच्या मदतीने १३१ बॉलमध्ये २८ धावा केल्या. कुलदीपने पहिल्यांदा कसोटीमध्ये एवढे बॉल खेळले. याआधी डिसेंबर २०२२मध्ये कुलदीपने बांगलादेशविरुद्ध ११४ बॉलमध्ये ४० धावांची खेळी ेली होती.
दुसरीकडे विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल केवळ दुसरा सामना खेळत होता मात्र त्याची बॅटिंग पाहून अनुभवी फलंदाज खेळत असल्याची जाणीव होत होती. जुरैलने सुरवातीला सांभाळत बॅटिंग केली मात्र जम बसल्यावर त्याने जोरदार प्रहार केले. जुरेलने १४९ बॉलचा सामना करताना ९० धावा केल्या.