
३ मार्चला मराठ्यांचं राज्यव्यापी आंदोलन
मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळूनही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं समाधान न झाल्याचं चित्र आहे. राज्य सरकारला (Maharashtra Government) त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळेस त्यांनी सर्व मराठा बांधवांना ३ मार्च रोजी सक्तीने आंदोलन करायचं असं सांगितलं आहे. त्यांची ही भूमिका लक्षात घेऊन मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) जरांगेंना आंदोलनाची नेमकी दिशा स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने उद्या २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा बांधव आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला विरोध करणाऱ्या नेत्यांना 'तुमच्या सर्वांचा सुफडा साफ करू शकतो' असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्यांच्या या भाषेमुळे ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवाय जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा सकल मराठा समाजाला सांगितली आहे. त्यानुसार, ३ मार्च रोजी मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या आंदोलनावरुन कायदेशीर लढाई सुरू झाली असून उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे.
'मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्द्यांवर मनोज जरांगेंना २६ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल, अशी हमीही जरांगेंच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे.