
एकेरी उल्लेख करत मनोज जरांगेंनी केली विजय वडेट्टीवारांवर टीका
जालना : मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळून देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अद्याप समाधानी झालेले नाहीत. त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी टीका केली होती. मनोज जरांगे या नावात आता दम राहिला नाही, असं ते म्हणाले होते. यावर मनोज जरांगे यांनी वडेट्टीवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत 'राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या नादाला लागायला सांगितलं आहे का?', असं म्हणत मनोज जरांगेंनी वडेट्टीवारांना फटकारलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले, वडेट्टीवारांनी आम्हाला दम वगैरे शिकवू नये. राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या नादाला लागायला, टीका करायला सांगितले आहे का? हा विरोधी पक्षनेता आहे की कोण आहे? विरोधी पक्षनेता तुझ्या घरातलं पद नाही, ते जनतेचं पद आहे. विरोधी पक्षनेता कोणत्याही एका जातीचा नसतो. आमचा दम कशाला काढता, आमचा दम तुम्ही मुंबईत बघितला नाही का? राहुल गांधी साहेब असले नेते कशाला निवडतात काय माहिती! तू तुझ्या पक्षाचं बघ ना. नाहीतर सगळा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल. त्यामुळे राहुल गांधी यांनी वडेट्टीवारांना नीट बोलायला सांगावे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?
मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दात आता दम राहिलेला नाही. जे मिळालंय, त्यामध्ये त्यांनी समाधानी राहावे. जरांगे-पाटील यांच्या बोलण्यात आता गर्व आणि गुर्मी जाणवते. अशाने जरांगे पाटील यांचा हार्दिक पटेल होईल, अशी खोचक टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती.