
अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections) भाजपाचा (BJP) प्रभाव वाढवण्यासाठी भाजपा तगडी रणनिती आखत आहे. विरोधी पक्षांमधील (Opposition Parties) अनेक बडेबडे नेते भाजपने आपल्या साथीला घेतले आहेत. त्यामुळे निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाविकास आघाडीला (MVA) मोठे धक्के पचवावे लागत आहेत. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) हे मविआचे दोन प्रमुख नेते महाराष्ट्रात विरोधी आघाडीचं नेतृत्व करत आहेत. मात्र आता उद्धव ठाकरे देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे तसेच संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीकास्त्र उपसलं.
आमदार रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड बैचेन आहेत. त्यांना कधी एकदा मोदीजींचं दर्शन घेतो आणि माफी मागतो, असं झालं आहे. मी मोदीजींसमोर कधी आत्मसमर्पण करतो, अशी त्यांची अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे हे सध्या काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील, असा दावा रवी राणा यांनी केला.
मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु
एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एनडीए आघाडीत आले. अजित पवारही मोदींसोबत आले. उद्धव ठाकरे यांना अहंकारामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला होता. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.
संजय राऊत म्हणजे राज्यावरचं विघ्न
यावेळेस रवी राणा यांनी संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहेत. संजय राऊत हे दिल्लीत आहेत, पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचा शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा बेगडी आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.