मी मेलो तर मला शासनाच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे
जालना : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटी जेथून खरी मराठा आरक्षणाला सुरुवात झाली त्या ठिकाणी जरांगेंनी पुन्हा बेमुदत उपोषण पुकारले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे जरांगेंनी लवकरात लवकर उपचार घ्यावेत अशी मागणी मराठा बांधवांकडून केली जात आहे. मात्र, उपचार न घेण्यावर जरांगे ठाम आहेत. तसेच मेलो तर शासनाच्या दारात नेऊन टाका, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी, अधिवेशन घेऊन ‘सगेसोयऱ्या’बाबत कायदा मंजूर करावा, यासाठी शनिवार १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत. जरांगे यांची परवानगी नसताना त्यांच्यावर उपचार करण्यात आले याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काळजीची गरज असेल तर सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा पुढील आंदोलनासाठी मुंबईला जाण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
‘मी वैद्यकीय उपचार घेणार नाही. मला झोपेत सलाईन लावू नका. सलाईन लावायचे असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता ते सांगा. मायबाप समाज तुम्ही सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. अंमलबजावणी झाल्याशिवाय उठणार नाही. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. अंत पाहू नका. मी जर मेलो तर मला शासनाच्या दारात नेऊन टाका,’’ असे मनोज जरांगे यांनी काल आंतरवाली सराटी येथे उपस्थित मोठ्या जनसमुदायाला सांगितले. यावेळी जरांगे यांनी त्यांना लावलेली सलाईन काढून फेकून दिली.
उच्च न्यायालयाकडून जरांगेंना उपचाराबाबत विचारणा
दरम्यान मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) औषध उपचाराच्या संदर्भात विचारणा केली आहे. जरांगे उपचार घेणार की नाही, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या उपोषणाच्या संदर्भात एक याचिका दाखल केली. त्यावरून न्यायालयाने जरांगे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.