
काय आहेत दोन मोठे बदल?
नवी दिल्ली : भारतात चित्रपटांसाठी (Indian Films) राष्ट्रीय पुरस्कार (National Film Awards) सर्वोच्च मानला जातो. यंदाच्या वर्षापासून या राष्ट्रीय पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये दोन मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. यानुसार बक्षिसाची रक्कम आणि दोन श्रेणींच्या पुरस्कारांची नावे बदलण्यात आली आहेत. यापुढे राष्ट्रीय पुरस्कारांच्या दोन श्रेणी ज्यांना इंदिरा गांधी (Indira Gandhi) व नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांच्या नावाने ओळखल्या जायच्या त्या श्रेणींच्या पुरस्कारांचे नाव बदलण्यात येणार आहे.
समितीने सुचविलेल्या बदलांनुसार, 'दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार' (Indira Gandhi Award for Best Debut Film of a Director) हे नाव बदलून 'दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट', असे करण्यात आले आहे. तर 'नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा नर्गिस दत्त पुरस्कार' (Nargis Dutt Award for Best Feature Film on National Integration) आता 'राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म' म्हणून ओळखला जाईल. या श्रेणीमध्ये, सामाजिक समस्या आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुरस्कार श्रेणी एकत्रित केल्या आहेत.
बक्षिसाच्या रक्कमेतही करण्यात आला बदल
बक्षिसाची रक्कम, जी आधी निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये विभागली जात होती, ती आता फक्त दिग्दर्शकाला दिली जाईल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीच्या एका सदस्याने सांगितले की, “समितीने कोरोनाच्या काळात बदलांचा विचार केला होता. हे बदल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे." यंदाच्या वर्षापासून या बदलांची अंमलबजावणी करण्यात येईल.