नातेवाईकाच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करुन परतत असतानाच काळाचा घाला
नांदेड : नांदेड जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास भोकर-उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळ कारचा भीषण अपघात (Nanded Accident) झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत.
रात्रीच्या सुमारास कार नाल्यात पडली. पाणी असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडताना अडथळा निर्माण झाला. त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने आसपास शेतात असलेले काही लोक मदतीसाठी आले. त्यांनी मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. त्याचबरोबर अपघाताची माहिती भोकर पोलिसांना दिली.
भोकर तालुक्यातील रेणापूर येथील भालेराव कुटुंब वनेल, नवीपेठ ( जि. निजामाबाद, तेलंगणा ) येथे विटभट्टीच्या कामाला होते. सदर कुटुंब भोकर शहरातील शेखफरीदनगर येथे संतोष भालेराव यांच्या मुलीच्या पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी आले होते. वाढदिवस साजरा करुन रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओने ११ जण परत वनेल येथे जात होते. दरम्यान, उमरी रस्त्यावरील मोघाळी शिवारातील पुलावरुन हे वाहन पुलावरून खाली कोसळून अपघात घडला.
या भीषण अपघातात सविता श्याम भालेराव (वय २५), प्रीती परमेश्वर भालेराव (वय ८) सुशील मारोती गायकवाड (वय ९) रेखाबाई परमेश्वर भालेराव(वय ३०), अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती भोकर तालुक्यातील रेणापूर गावातील रहिवासी आहेत.
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे राहत होते .