Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

MNS BJP Alliance : भाजप मनसे युती होणार? मनसेच्या तीन प्रमुख नेत्यांनी घेतली देवेंद्रजींची भेट!

MNS BJP Alliance : भाजप मनसे युती होणार? मनसेच्या तीन प्रमुख नेत्यांनी घेतली देवेंद्रजींची भेट!

काय आहे या भेटीमागचे कारण? राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण

मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आल्या असतानाच आता राज्यासह देशभरातल्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होत आहेत. प्रत्येक राज्यात भाजपची (BJP) ताकद वाढत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातही भाजपची साथ दिलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाचा (NCP symbol) ताबा मिळाला. परिणामी भाजपचीच ताकद अधिक वाढली आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व असलेला मनसे (MNS) पक्षही भाजपला साथ देणार अशी चर्चा रंगली आहे. मनसेच्या तीन प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भाजप-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.

मनसेचे तीन नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. या भेटीचं नेमकं कारण काय, भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटीमागचं गुपित आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मागील काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस अनेकदा एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मनसे-भाजप यांच्या युतीबाबत अनेकदा चर्चा झाली. सोबतच भाजपच्या नेत्यांनी देखील अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. अशात आता मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतल्याने भाजप- मनसेमध्ये युती होणार का? याबाबत चर्चा होत आहे.

फडणवीसांसोबतची ती सदिच्छा भेट : संदीप देशपांडे

दरम्यान याच भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही. बऱ्याच दिवसांपासून फडणवीसांना भेटायचं होतं. त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे ती एक फक्त सदिच्छा भेट होती. तसेच पुढेही प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेटी नक्कीच होतील. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, तर प्रत्येक वेळी त्याचा काहीतरी अर्थ काढला पाहिजे असे नाही. एकमेकांना भेटणं महाराष्ट्राचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील राज ठाकरे यांना येऊन भेटतात. त्यामुळे आम्ही देखील त्यांना भेटलो', असं देशपांडे म्हणाले आहेत.

Comments
Add Comment