
साधूंवर कडक कारवाई करण्याची मागणी
नाशिक : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला (Sant Nivruttinath Maharaj Yatra) उद्यापासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने अनेक वारकरी (Warkari) त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. सुमारे पाच लाख भाविक आणि ६०० हून अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, या वारकऱ्यांवर त्र्यंबकेश्वरमधील साधूंनी दमदाटी केली. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांचे निवासस्थान ठरलेले असते. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांनी आपापल्या जागेवर आपले तंबू बांधले होते. मात्र, या ठिकाणी काही साधूंनी अडवणूक केल्याचा आरोप वारकऱ्यांकडून करण्यात आला आहे. काही साधूंनी येऊन ही जागा आमची आहे, असे म्हणत दमदाटी करून वारकऱ्यांवर शिवीगाळ केला. तसेच हातात चाकू घेऊन साधूंनी वारकऱ्यांचे तंबू उखडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या साधूंवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे, या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.