मुंबई: भारताचा क्रिकेटर मयंक अग्रवालच्या(mayank agrawal) आरोग्याबाबाबत अपडेट समोर आले आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटक संघाचे नेतृत्व करणाऱ्या मयांकची तब्येत अचानक बिघडली होती. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मयांकची तब्येत इतकी बिघडली होती की त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आता चाहत्यांना खुश करणारी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, मयांक अग्रवालची तब्येत आता ठीक आहे. त्याला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकेल. यानंतर तो बंगळुरूसाठी रवाना होणार आहे. दिल्लीविरुद्ध मयांक खेळणे कठीण आहे.
कर्नाटकचा कर्णधार मयांक अग्रवाल विमानात आजारी पडल्याने आगरतळाजवळी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आळे. मयांक मंगळवारी संघासोबत दिल्लीसाठी रवाना झाला होता. दरम्यान, विमानात चढल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. घश्यात जळजळही होऊ लागली. यानंतर मयांकला उलटीही होत होती.
रणजीमध्ये मयांकचा जलवा
कर्नाटकचा कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत आहे. त्याने गुजरातविरुद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात १०९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर गोव्याविरुद्ध खेळवलेल्या सामन्यात ११४ धावा केल्या होत्या. यानंतर त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते.
असे राहिले मयांकचे आंतरराष्ट्रीय करिअर
मयांकने आतापर्यंत भारतासाठी २१ कसोटी आणि ५ वनडे सामने खेळलेत. कसोटीच्या ३६ डावांमध्ये त्याने ४१.३३च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ४ शतके आणि ६ अर्धशतके ठोकली. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या २४३ इतकी आहे. याशिवाय वनडेच्या ५ डावांत त्याने ८६ धावा केल्या.