बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची पथके दाखल
अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) लोणी परिसरात एका बिबट्याने (Leopard) दहशत माजवली आहे. मागील दहा दिवसांत या बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोन चिमुरड्यांचा जीव गेला आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे लोणी गावातील अनेक वाड्या आणि वस्त्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
लोणी गावात १५ जानेवारी रोजी १५ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर २ दिवसांपूर्वी लोणी जवळीलच सादतपूर येथील एका मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी लोणी गाव आणि परिसरात जवळपास १६ पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच नाशिक आणि पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीम श्वान पथक आणि ड्रोनच्या माध्यमातून या बिबट्याचा शोध घेत आहेत. राज्यातून दोन पथके सध्या लोणी गावात दाखल झाली आहेत.
या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे यासाठी वनविभागाची पथकेही दाखल झाली आहेत. त्यामुळे आता हा बिबट्या कधीपर्यंत जेरबंद होणार हाच प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे. तसेच या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील असल्याने लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद व्हावा अशी मागणी गावकरी करत आहेत.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे लोणी गाव
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे हे लोणी गाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची भेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. तसेच त्यांचे सांत्वन करत बिबट्याला पकडण्यासाठी विशेष सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
नगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ
नगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ होत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात आलाय. तसेच ही टीम तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. बिबट्याचा संचार असलेल्या भागामध्ये शेतीच्या कामासाठी रात्रीच्या ऐवजी दिवास वीज देता येईल का याविषयी देखील प्रस्ताव महावितरणाकडे पाठवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.