Thursday, July 4, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकिती जवळ... किती दूर!

किती जवळ… किती दूर!

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
आई जर डोके धरून बसली, तर तिला बाम लावून देणारा नवरा असेल किंवा तिच्या हातून काही काचेचे भांडे फुटल्यावर पटकन वाकून काचा उचलणारी मुले असतील, तर जगात बाईला कुठची समस्याच उरणार नाही. हेच पुरुषाच्या दृष्टीने पाहता, ऑफिसमधून आल्यावर जर नवऱ्याचा मूड ठीक नसेल, तर बाईला तो ओळखता आला पाहिजे.
ज्ञानात भर घालण्याबरोबर सणसणीत थोबाडीत मारणारे काही गुडमॉर्निंगचे मेसेजेस घेऊन मी माझा अख्खा दिवस घालवते. त्यातीलच एक मेसेज –
‘प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता-ऐकता येते आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत… ही आजची वस्तुस्थिती आहे.’
घरात आपण असून नसल्यासारखे असतो. म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाचे काहीतरी चालू असते. पण त्यांचे घरातल्यांबरोबर काही चालू नसते. आई जर डोके धरून बसली, तर तिला बाम आणून आणि लावून देणारा नवरा असेल किंवा तिच्या हातून काही काचेचे भांडे फुटल्यावर पटकन वाकून काचा उचलणारी मुले असतील, तर जगात बाईला कुठची समस्याच उरणार नाही. हे मी केवळ बाई असल्यामुळे बाईविषयी लिहीत आहे. आपण हेच उदाहरण पुरुषाच्या दृष्टीने घेतले तर ते असे होईल की ऑफिसमधून आल्यावर जर नवऱ्याचा मूड ठीक नसेल, तर बाईला तो ओळखता आला पाहिजे नि त्या अानुषंगाने दिवसभर घडलेल्या त्रासदायक घटनांची यादी त्याच्यापुढे टाकायला नको किंवा सुट्टीच्या दिवशी उशिरापर्यंत लोळत पडला असेल, तर त्याला सकाळी उठायचे महत्त्व सांगून त्रास देऊ नये इ. आजकालच्या मुलांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. घरातल्या २ मुलांसाठी वेगवेगळ्या स्वयंपाक होतो, कारण काही पदार्थ एक मुलगा खाऊ शकत नाही. पण तो पदार्थ दुसऱ्याच्या अत्यंत आवडीची असू शकतो.
आपल्या लक्षात आले असेल की, वरील उदाहरणात मी कुठेही कुटुंबातील इतर माणसे दाखवलेलीच नाहीत. आजकाल आजी-आजोबा किंवा दीर-नणंदा यांच्यासोबत फारसे कोणी कुटुंबात एकत्रितपणे राहताना दिसत नाहीत. असो. जवळच्या माणसांशी संवादच तुटल्यामुळे त्यांना काय होतंय, हे घरातल्यांना कळू शकत नाही. म्हणजे माणूस बोलू लागला, तर त्याचा घसा बसलाय, त्याला ताप आलाय हे कळू शकतं ना… एखादा माणूस कोणत्याही वेळेस झोपलाय, तर घरातल्यांचा असा समज होऊ शकतो की थकलाय म्हणून पडलाय. त्याला ताप आहे हे कळण्यासाठी त्याच्या अंगाला हात लावण्याची गरज आहे ना… तेवढा वेळ आणि तेवढी समज कोणाकडे आहे?
या गोष्टी कदाचित तुम्हाला बढा-चढाकर वाटत असतील. पण परवा मी माझ्या शेजारच्याच घरी अतिमहत्त्वाच्या कामानिमित्ताने गेले, तेव्हा सहज बोलता-बोलता त्या बाई म्हणाल्या की, आमच्या घरी स्वयंपाकासाठी ३ बायका येतात. ती म्हणाली की, वर्षानुवर्षापासून माझ्याकडे एक बाई येते, ती आता खूप थकली आहे. तिला मी काढू शकत नाही. माझ्या नवऱ्याला या बाईच्या हातचे काही आवडत नाही. याही कारणासाठी एक वेगळी बाई त्याची पोळी-भाजी बनवायला ठेवली आहे. माझी मुलगी आरुषी आता तरुण झाली आहे. तिला पोळी भाजी, वरण-भात हे पदार्थ आवडतच नाहीत. मग तिच्यासाठी पिझ्झा-बर्गर-चायनीज डिशेस बनणारी एक बाई मला मिळाली, तिला ठेवले आहे. “आनंदाने सर्व जेवतात ना… हेच तर महत्त्वाचं आहे.” मी काहीतरी बोलायचे म्हणून बोलले. ती म्हणाली, “अगदी माझ्या मनातलं बोललात!”
कधी कधी मनाला न पटणाऱ्या गोष्टींचा ताण घेऊन मी घरात येते. माझ्या मनातली सगळी उलघाल हा लेख लिहिल्यावर थोडीफार कमी होईल असे वाटतेय. बघूया. खिडकीतून बाहेर डोकावले, तेव्हा सोसायटीचा माळी लांबलचक पाइपच्या टोकावर बोट देऊन झाडांवर पाणी मारत होता आणि माझ्या लक्षात आले की, पाइपला कुठेतरी मध्येच एक छोटं भोक पडलं आहे आणि त्या भोकातून पाण्याचा फवारा उडत आहे. माळी जितके त्या पाइपचे पुढचे टोक दाबत होता तितक्या जोरात तो फवारा अधिक उंच उडत होता. गंमत म्हणजे माळी पाणी देण्यामध्ये गर्क होता आणि हा उडणारा फवारा फक्त मला दिसत होता.
आजकाल माणसांचेही असेच झाले आहे. अत्यंत प्रेशरने ते कोणते तरी काम करत असतात. काम होत असते, नाही असे नाही पण नको त्या जागी अशी छोटी छोटी छिद्रे मनावर पडलेली असतात, जेथून खूप काही वाया जात असते. नको तिथे ताण असतो. शरीराचे एक एक भाग पंक्चर केल्यासारखे शिथिल होत जातात, तर कधी हवा भरल्यासारखे फुगतात, सुजतात. गंमत म्हणजे हे सर्व कशामुळे हे आपल्याही लक्षात येत नाही! म्हणूनच धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे फक्त पुढे पाहू नका. आयुष्यात थांबून, थोडे मागे सुद्धा पाहा कदाचित समस्या तिथेच असू शकेल, जी आपल्याला सहज सोडवता येऊ शकेल! हेच जे आपल्या बाबतीत लागू होतंय ना, तेच कदाचित जवळच्यांच्याही बाबतीतही लागू होऊ शकेल!
pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -