अहमदनगर : गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची (Ahmednagar Accident) घटना घडली आहे. कल्याण-नगर महामार्गावर (Kalyan – Nagar highway) एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची एकत्रित धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी या अपघातासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर ऊस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांच्यात ढवळपुरी फाट्या जवळ मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार धडक झाली. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
त्यानंतर तातडीने जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.