
नवी दिल्ली : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि २००२ च्या गुजरात दंगलीत तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या (Bilkis Bano Case) करणाऱ्या सर्व ११ दोषींनी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) दणक्यानंतर अखेर काल आत्मसमर्पण (Surrender) केले. त्यांना २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याची मुदत देण्यात आली होती, त्यानुसार काल रात्री ११:४५ वाजता तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले.
गुजरात सरकारने या ११ दोषींना माफीच्या आधारावर मुदतपूर्व सुटका करून तुरुंगातून सोडले होते. मात्र, या प्रकरणी खुद्द बिल्कीस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यासह काही जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. दोषींच्या शिक्षेच्या माफीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत गुजरात सरकारला न्यायालयाने झटका दिला. गुजरात सरकारला शिक्षा माफ करण्याचा अधिकार नव्हता असं म्हणत न्यायालयाने दोषींच्या शिक्षामाफीचा निर्णय रद्द केला.
८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने या दोषींना दोन आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दोषींनी आत्मसमर्पण करण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र, याबाबतचे सर्व अर्ज फेटाळत सुप्रीम कोर्टाने मुदतवाढीसाठी नकार दिला.