भारताला तब्बल २८ वर्षांनी मिळाले यजमानपद
नवी दिल्ली : भारताने या वेळी ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे (Miss World Pageant) म्हणजेच विश्वसुंदरी स्पर्धा २०२४चे आयोजन स्वीकारले आहे. तब्बल २८ वर्षांनी भारताला हा बहुमान मिळाला आहे. ही स्पर्धा मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये रंगणार आहे.
जगभरातील सौंदर्य, वैविध्य आणि सक्षमीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आश्वासन देणारी अशी ही भव्य स्पर्धा जगभरात प्रसारित केली जाईल. येत्या १८ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान ही स्पर्धा भारतात दिल्ली येथील सभा मंडपम आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांमध्ये पार पडेल.
Chairman of Miss World, Julia Morley CBE stated “Excitement fills the air as we proudly announce India as the host country for Miss World. A celebration of beauty, diversity, and empowerment awaits. Get ready for a spectacular journey! 🇮🇳 #MissWorldIndia #BeautyWithAPurpose
— Miss World (@MissWorldLtd) January 19, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील हॉटेल अशोक येथे इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (ITDC) द्वारे आयोजित ‘उद्घाटन समारंभ’ आणि ‘इंडिया वेलकम द वर्ल्ड गाला’ या कार्यक्रमांनी उत्सवाची सुरुवात होईल. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) ९ मार्च रोजी स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
भारताने या पूर्वी सन १९९६ मध्ये बेंगळुरू येथे मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. रीता फारिया पॉवेल ही भारताची पहिली विश्वसुंदरी आहे. जीने १९६६ मध्ये मिस वर्ल्डचा मुकुट मिळवत इतिहास रचला. सन १९९४ मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, १९९७ मध्ये डायना हेडन, १९९९ मध्ये युक्ता मुखी आणि २००० मध्ये प्रियांका चोप्रा यांनीही मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. अगदी अलिकडील काळात मानुषी छिल्लरने हिने २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकून हा वारसा पुढे सुरु ठेवला.
दरम्यान, ७१व्या मिस वर्ल्ड फायनलचे ९ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० ते रात्री १०:३० या वेळेत थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ, ज्युलिया एव्हलिन मॉर्ले सीबीई यांनी या स्पर्धेचे यजमानपद भारताने घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, मिस वर्ल्ड हा केवळ एक कार्यक्रम नसून महिलांच्या यशाचा उत्सव साजरा करणारा आणि महिनाभर चालणारा उत्सव आहे. जगाला भारतात आणणे आणि जगासमोर भारताचे प्रदर्शन करणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे.
भारतातील मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनचे सल्लागार मुनीश गुप्ता यांनी सांगितले की, हा कार्यक्रम जागतिक प्रेक्षकांना भारताची संस्कृती, परंपरा, वारसा, कला, हस्तकला, वस्त्र, पाककृती आणि पर्यटन यांची समृद्ध टेपेस्ट्री प्रदान करेल. प्रत्येक स्पर्धकाकडे MissWorld.com वर एक समर्पित मीडिया चॅनेल असेल. जे ते टॉप २० फायनलमध्ये स्थान देण्यास पात्र का आहेत हे दाखवण्यासाठी मदत करेल.
वर्ल्ड टॉप डिझायनर अवॉर्ड, मिस वर्ल्ड टॉप मॉडेल, मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज, टॅलेंट फायनल, मल्टी-मीडिया चॅलेंज आणि बरेच काही या स्पर्धेत असेल. मिस वर्ल्ड फायनलची निर्मिती एन्डेमोल शाइन इंडियाद्वारे केली जाईल. इव्हेंट निर्मितीमध्ये देशाच्या उत्कृष्टतेवर अधिक भर दिला जाईल.