नेमकं काय झालं?
मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (Mumbai Trans Harbour link Project) म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे (Atal Setu) शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शनिवारी १३ जानेवारीला सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात आला आणि पहिल्या दोन दिवसांतच लाखो मुंबईकरांचा याला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही वाहनचालकांर पोलिसांनी कारवाई केली आहे.
हल्ली सर्वांनाच प्रत्येक नवा क्षण सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे पहिल्याच वेळी अटल सेतूवरुन प्रवास करतानाचा फोटो काढण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी अनेक जणांनी वाहने थांबवून गर्दी केली. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली असून तब्बल २६४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
शनिवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान बहुतांश प्रवाशांनी हा मार्ग पाहण्यासाठी येथून प्रवास केला. मात्र, अटल सेतूवर विनाकारण वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्या २६४ बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना देखील पोलिसांनी चांगलाच दणका दिला.
मोटर वाहन कायदा कलम १२२ व १७७ कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाहनचालकांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर, ‘अटल सेतू’वर विनाकारण वाहने थांबवून वाहनचालकांनी स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.