वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : संगीत क्षेत्रातील (Music field) आपल्या मोलाच्या योगदानाबद्दल ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ (Padma Vibhushan) असे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पटकावणार्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Classical singer Prabha Atre) यांचे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
प्रभा अत्रे वयाच्या ९२ व्या वर्षी देखील गाणं गात होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत होत्या. आज त्या ‘स्वरप्रभा’ या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या. मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं.
प्रभा अत्रे या गायिकेसोबतच संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रसिद्ध होत्या. अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यासाठी त्या सध्या युट्यूबच्या माध्यमातून काम करत होत्या. त्यांचे निधन झाल्याने संगीतक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रभा अत्रे यांची अमेरिकास्थित भाची पुण्यात आल्यानंतर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यानुसार अंत्यदर्शनाची वेळ कळवण्यात येईल.
कोण होत्या प्रभा अत्रे?
प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता.
भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याच्या कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करत. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’, ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत. प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप – मल्हार, तिलंग – भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे.
तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारताच्या व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.
प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.