Monday, September 15, 2025

शिवडी न्हावा-शेवानंतर आता विरार ते अलिबाग नवीन कॉरिडॉर होणार

शिवडी न्हावा-शेवानंतर आता विरार ते अलिबाग नवीन कॉरिडॉर होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नवी मुंबई : "आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. अटल सेतूचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. आता उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले. आपल्या देशात मोदी राजं आलं त्यामुळे हा संतू पूर्ण झाला. शिवडी न्हावा-शेवा नंतर आता विरार ते अलिबाग नवीन कॉरिडॉर करत आहोत", अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई येथील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 40 वर्षात जे झालं नाही ते मोदी सरकारने करून दाखवलं. काही लोक म्हणत होते फ्लेमिंगो सेन्सेटीव्ह आहेत त्याचे काय होणार? आज फ्लेमिंगोची संख्या देखील वाढली आणि सेतू देखील बनला. मोदी सरकारने एमएमआरडीएला कर्ज देण्याचा निर्णय घेतला. हा सेतू आम्ही कोस्टलरोडला जोडत आहोत. वर्सोवा ते विरार आम्ही तयार करत आहोत हे स्वप्न येत्या 3 ते 4 वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

विरार ते अलिबाग आम्ही नवीन कॉरिडॉर करत आहोत. एक रिंग रोड आम्ही तयार करत आहोत. हे स्वप्न येत्या तीन ते चार वर्षात आम्ही पूर्ण करु हा आम्हाला विश्वास आहे. सुर्या योजनेचा देखील आम्ही शुभारंभ आम्ही करणार आहोत. याशिवाय, नवीन इकॉनॉमिक हब तयार होणार आहे, असेही देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, या सेतूमुळे या विभागाला जोडला जाईल विमान तळ देखील याच वर्षाच्या शेवट पर्यत होणार आहे. मोदी आमच्या मागे डोंगरासारखे उभे आहेत म्हणून हे प्रकल्प पूर्ण होत आहेत.

Comments
Add Comment