Monday, May 12, 2025

महामुंबईमहाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

Eknath Shinde : २०१९ मध्ये जनतेसोबत बेईमानी केलेल्यांना मोठी चपराक मिळाली!

Eknath Shinde : २०१९ मध्ये जनतेसोबत बेईमानी केलेल्यांना मोठी चपराक मिळाली!

आमदार अपात्रतेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य


मुंबई : अनेक महिने प्रतिक्षेत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification) निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचंच पारडं जड ठरलं. शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल देत दोन्ही बाजूंकडच्या आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी रात्री संवाद साधला व विरोधकांवर हल्लाबोल चढवला. 'हुकुमशाहीने पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका बसला', असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.


एकनाथ शिंदे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय म्हणजे सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे. सत्तेत आल्यापासून कायम एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे काहीजण बोलत होते. परंतु अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीने पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे. आजचा जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे.


आमदार अपात्रचा प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधक कोणालाच मानत नाहीत. निवडणूक आयोग, न्यायालयाला देखील मानत नाहीत. ते सर्व संस्थांपेक्षा नेहमी स्वतःला मोठे मानतात. सुप्रीम कोर्टाला देखील अनेक सल्ले देण्याचं त्यांनी काम केलं म्हणून त्यांना आज मोठी चपराक मिळाली आहे. २०१९ मध्ये ज्यांनी जनतेसोबत बेईमानी केली त्यांना हा मोठा चपराक आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.



आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ हून अधिक जागा आमच्याच


२०१९ साली बाळासाहेबांचे विचार विकले आणि सत्तेसाठी केले. बाळासाहेबांनी काँग्रेसला कधी जवळ गेले नाही. सत्तेसाठी यांनी काँग्रेसला जवळ केले आणि सरकार स्थापन केले. बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या खऱ्या शिवसेनाला आज न्याय मिळाला आहे. प्रभू श्रीरामाने २२ जानेवारीच्या अगोदर आशीर्वाद दिला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या आधी निर्णय आल्याने सर्व जनतेला न्याय मिळाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकून येणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment