मुंबई: अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मालिकेसाठी रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर विराट कोहलीचेही टी-२० फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने बीसीसीआयला सूचित केले होते की ते टी-२० निवडीसाठी उपलब्ध आहेत. अशातच दोन्ही खेळाडूंकडे दुर्लक्ष करणे कठीण होते. रोहित शर्मा सध्या तीनही फॉरमॅटसाठी टीम इंडियाचा अधिकृत कर्णधार आहे. मात्र तो आणि विराट कोहलीने गेल्या एका वर्षापासून एकही टी-२० सामना खेळलेला नाही.
सिराज आणि बुमराहला आराम
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडत समितीने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहला आराम दिला आहे. सिराज आणि बुमराहने केपटाऊनमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. दोन्ही वेगवान गोलंदाज आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी उतरणार आहेत.
भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीत होईल. त्यानंतर दुसरा टी-२० सामना १४ जानेवारीला इंदौरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शेवटचा टी-२० सामना १७ जानेवारीला होईल.
अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार.