सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान नितेश राणे यांची सडकून टीका
मोर्चात दगडफेक प्रकरणी एकजण ताब्यात
सोलापूर : सोलापुरात काल हिंदू जन आक्रोश मोर्चाचं (Hindu Jan Akrosh Morcha) आयोजन करण्यात आलं होतं. त्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह (T Raja Singh)यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी मुस्लिमांना मालमत्तेविषयी अमर्याद अधिकार देणाऱ्या वक्फ बोर्डावर (WAQF Board) नितेश राणे यांनी सडकून टीका केली.
नितेश राणे म्हणाले की, “वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात ही कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहिल”, असा विश्वास नितेश राणे यांनी दिला.
वक्फ म्हणजे काय?
कोणतीही जमीन वक्फ (WAQF) होणे म्हणजे त्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. अशा स्थितीत ती जमीन वक्फ बोर्डाची मालमत्ता बनते आणि नंतर ती सार्वजनिक कामांसाठी वापरली जाते. एवढेच नाही तर, एखादी मालमत्ता वक्फ झाल्यानंतर ती पुन्हा खाजगी होऊ शकत नाही. तुमची मालमत्ता वक्फची आहे आणि तुमची नाही, असे वक्फ बोर्डाने सांगितले तर तुम्ही न्यायालयातही जाऊ शकत नाही. कोणताही मुस्लिम त्याच्या कोणत्याही मालमत्तेला वक्फ करू शकतो.
मोर्चात दगडफेक प्रकरणी एकजण ताब्यात
मोर्चादरम्यान सोलापुरात काही दुकानांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. दुकानांवर दगडफेकीच्या घटनेमध्ये दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, तर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. मोर्चाच्या वेळेस पोलिसांनी या परिसरात कॅमेरे लावलेले होते. त्यामुळे फुटेज पाहून आणखी आरोपी निश्चित केले जाणार आहेत.