नवी दिल्ली : अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची (Ramlalla) प्राणप्रतिष्ठापना (Pran Pratishtha) सोमवार, २२ जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे अयोध्येत रामाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. परंतु, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी या दिवसाचीच का निवड करण्यात आली? हा दिवस प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यामागे काय कारण आहे?
ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात अभिजीत मुहूर्तावर झाला होता. सोमवार, २२ जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रात अभिजीत मुहूर्ताचा योगायोग आहे. अशा स्थितीत, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी १२.११ पासून सुरू होईल आणि १२.५४ पर्यंत चालेल. तसेच या विशेष तिथीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. या वेळी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त १२.१९ ते १२.३० पर्यंत असेल. या काळात मृगाशिरा नक्षत्र असेल. त्यामुळेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी ही तारीख निवडण्यात आली आहे.
याशिवाय या शुभ मुहूर्तावर रामलल्लाचा अभिषेक केल्याने प्रभू श्रीराम सदैव मूर्तीमध्ये वास करतील, अशीही श्रद्धा आहे. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते. त्यामुळे रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकासाठी पौष महिन्यातील द्वादशी निवडण्यात आली आहे.