सुमिता चितळे, मुंबई ग्राहक पंचायत
घरून ऑफिससाठी डबा नेताना पोळी गरम आणि मऊसूत राहावी म्हणून आपण ती ॲल्युमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळून नेतो किंवा हॉटेलमधूनही आपण डोसा, नान, तत्सम पदार्थ मागवितो, तेव्हा ते आपल्याला अशाच फॉईलमध्ये पॅक केलेले मिळतात. असे पदार्थ खूप वेळाने सेवन करतानासुद्धा आपल्याला आवडतात. तसेच काही वेळा रस्त्यावरील स्टॉलवर गरम पदार्थ, ताजे पदार्थ उदा. भाजी, वडापाव इ. आपल्याला वर्तमानपत्रात पॅक करून मिळतात. कारण ही वर्तमानपत्रे स्वस्त असतात. याबरोबरच गरम पदार्थ (उदा. सांबार किंवा चहा/ कॉफीसुद्धा) प्लास्टिकच्या पिशवीतून मिळते. वर्तमानपत्रे किंवा प्लास्टिकच्या पिशव्या सहज कुठेही मिळू शकतात, शिवाय त्या स्वस्त असल्याने खाद्यपदार्थांच्या किमतीवर फारसा परिणाम होत नाही. ही झाली विक्रेत्याची बाजू.
त्याची दुसरी काळी बाजू म्हणजे ही अशी सहज उपलब्ध असलेली वेष्टने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. वर्तमानपत्रात पॅक केलेले पदार्थ सेवन केल्यास वृत्तपत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये असलेली रसायने त्या पदार्थात मिसळून आपल्या पोटात जातात. ही रसायने घातक असल्याने त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. कर्करोग होऊ शकतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, शरीरातील महत्त्वाचे अवयव कमकुवत होतात. यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच अन्नाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. शिवाय आपण रद्दीत दिलेली वर्तमानपत्रे हाताळताना, वितरित करताना ती स्वच्छ ठिकाणी ठेवली जात नाहीत. त्यामुळे ती जंतुयुक्त आणि विषाणू असलेली असू शकतात. त्यातून आपण जर पदार्थ बांधून घेतले, तर ते आपल्या पोटात जातात.
फक्त छोटी हॉटेल्स आणि रस्त्यांवरचे विक्रेतेच कशाला काही घरांमध्येसुद्धा तळणीचे तेल टिपायला घरात सहज उपलब्ध असणारा वृत्तपत्राचा कागद वापरतात. तेव्हा ते हा विचारच करीत नाहीत की, तेल कागदात शोषले जाते, पण त्या बदल्यात त्यावरील शाईतील घातक रसायने त्या पदार्थात मिसळली जात आहेत. असे शरीराचे होणारे नुकसान पाहता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI – Food Safety and Standards Authority of India) च्या सीईओंनी सर्व अन्नविक्रेते आणि ग्राहकांना ‘खाद्यपदार्थ साठविण्यासाठी, डिलिव्हरी करण्यासाठी किंवा पॅकिंग करण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे त्वरित थांबवावे’, असे आवाहन केले आहे. भारतात काही राज्यांमध्ये असे दिसून आले आहे की, किडनी, घशाचे आजार, कर्करोग आणि वंध्यत्वाने ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीतून आलेले गरम पदार्थ खाणे किंवा पेय पिणे. प्लास्टिकमध्ये पॉलिथिलीन, पॉलिव्हिनाईल क्लोराईड, पॉलिस्टीरिन असते, ते शरीराला हानिकारक असते. ग्रामीण भागात तर अशी उदाहरणे जास्त संख्येने आढळतात. प्लास्टिक जे पुनर्चक्रित (Recycled) प्लास्टिकपासून बनलेले आहे, ते प्लास्टिक खाद्यपदार्थ साठविण्यास, पॅकिंग करण्यास आणि वितरित करण्यास वापरणे यासाठी FSSAI ने मनाई केली आहे.
सर्वसाधारणपणे Polyethylene terephthalate – PET आणि High-density polyethylene – HDPE या संरचनेचे प्लास्टिक वापरायला हरकत नाही. ते शरीराला अपायकारक नाही. अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कॅटेनर्स खाद्यपदार्थ साठवायला किंवा वितरित करायला आपण वापरू शकतो. याचप्रमाणे ॲल्युमिनिअम फॉईलमध्ये गरम पोळी, डोसा, पराठा बांधतो किंवा ॲल्युमिनिअमच्या पिशवीत गरम पदार्थ ओततो, तेव्हा त्या पदार्थाची ॲल्युमिनिअम फॉईलबरोबर रासायनिक प्रक्रिया होते व तो पदार्थ आपल्याला सेवन करण्यास घातक ठरतो. त्यामुळे आपल्या निरामय आरोग्यासाठी असे करणे आपण टाळू या. या कारणासाठी खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्रे आणि ॲल्युमिनिअम फॉईल व पुनर्चक्रित (Recycled) प्लास्टिक न वापरण्याचे FSSAI ने सर्वांना आवाहन केले आहे.
FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असे सांगितले की, खाद्यपदार्थांचे वेष्टन (पॅकेजिंग मटेरियल) असे हवे, जे कोणत्याही वातावरणात आतील अन्नपदार्थांचे योग्य प्रकारे जतन करेल (त्याचे शेल्फ लाइफ वाढवेल), पदार्थाच्या गुणवत्तेत कोणताही बदल करणार नाही, शिवाय ग्राहकांच्या आरोग्याचेही रक्षण होईल. खाद्यपदार्थांची साठवणूक किंवा वितरण करण्यासाठी स्टील, झाडाची स्वच्छ व कोरडी पाने, काचेच्या बाटल्या यांचा उपयोग करावा. असे FSSAI ने सूचित केले आहे. या निर्देशानुसार काही ठिकाणी आपल्याला आशादायक चित्र दिसते. ते म्हणजे बाहेरून प्लास्टिक किंवा पेपर असतो, पण आतून केळीची पाने असे खाद्यवेष्टन काही हॉटेल्स किंवा खाद्यविक्रेत्यांकडून आपल्याला मिळते.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण या संस्थेच्या fssai.gov.in http://fssai.gov.in या वेबसाईटवर आपण पाहिल्यास खाद्यपदार्थांच्या वेष्टनांबद्दल सखोल माहिती मिळते. त्यांनी काढलेल्या पत्रकात कोणत्या खाद्यप्रकाराला कोणत्या आवरणाचे वेष्टन साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी योग्य आहे, याची विस्तृत माहिती मिळते. ती माहिती वाचून आपण सजग नागरिक बनू या. तसेच आरोग्यासाठी हानिकारक नसलेले खाद्यवेष्टन देण्याचे विक्रेत्यांना आवाहन करून जागरूक ग्राहक होऊ या.
[email protected]