नवी दिल्ली: कतारमध्ये(quatar) मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आणण्यात आली आहे. याबाबत भारत सरकारने म्हटले की आम्ही ८ जणांच्या कुटुंबियांसोबत नेहमी आहोत. भाजपने हा मोदी सरकारचा विजय असल्याचे म्हटले आहे तर काँग्रेसनेही याबाबत आनंद व्यक्त केला.
या महिन्यात दुबईत कोप २८ संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानीसोबत भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर हा निर्णय आला. पंतप्रधान मोदी आणि बिन हमद अल थानी यांनी सांगितले होते की त्यांच्यात भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबतही चर्चा झाली होती. यामुळे भारताच्या कूटनीतीचा हा विजय मानला जात आहे.
काय म्हटलेय परराष्ट्र मंत्रालयाने?
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, कतारच्या अपील न्यायालयाने दहरा ग्लोबल केसमध्ये ८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा कमी केली आहे. निर्णयाच्या तपशीलाची प्रतीक्षा असणार आहे. तचारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकारी गुरूवारी न्यायालयात हजर होते. याशिवाय सर्व खलाशांचे कुटुंबही तेथेच होते. आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरूवातीपासूनच उभे आहोत. भविष्यातही कॉन्सुलर अॅक्सेससह सर्व मदत करू.
काय आहे प्रकरण?
कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. सर्वांना २६ ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, कतारने आरोपांबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिलेली नाही.