
केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधात
भाजप आमदार आशिष देशमुख यांचा हल्लाबोल
मुंबई : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात (Nagpur bank scam) दोषी ठरलेले काँग्रसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यावर भाजप आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी हल्लाबोल चढवला. सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा आणि १२.५ लाखांचा दंड सुनावण्यात आला. यानंतर लगेचच तब्येतीच्या कारणास्तव त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा धागा पकडून आशिष देशमुख यांनी केदार यांच्यावर टीका केली.
आशिष देशमुख म्हणाले, २२ तारखेला न्यायालयाने सुनील केदार यांना शिक्षा सुनावली त्या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सुनील केदार यांचे आरोग्य चांगले होते. न्यायालयातून निघताना त्यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोषही स्वीकारला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी त्यांची तब्येत बिघडली आणि आता ते रुग्णालयात दाखल आहेत.
पुढे आशिष देशमुख म्हणाले, सुनील केदार यांचं शिक्षा सुनावली गेल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल होणं संशयास्पद आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) ज्या पद्धतीने ललित पाटीलला (Lalit Patil) तिथल्या अधिष्ठातांनी कारण नसताना दाखल करून घेतले होते तसाच हा प्रकार असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या बहुतांशी सर्व चाचण्या ते योग्य असल्याचे सांगत असून या सर्व प्रकाराची चौकशी वैद्यकीय शिक्षण विभागाने करावी, अशी मागणीही आशिष देशमुख यांनी केली आहे.
सुनील केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधात
ज्या प्रकरणात शेतकऱ्यांना २२ वर्षांनंतर न्याय मिळाला त्या प्रकरणात शिक्षा झालेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल करून घेऊन तुरुंगवासापासून थांबवणे योग्य नसल्याचं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं. सुनील केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधात राहिली आहे. त्याची पुनरावृत्ती या प्रकरणात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.