
मुंबई : क्रिकेट विश्वचषकाच्या (Cricket Worldcup) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा (India vs Australia) दारुण पराभव झाला. मात्र, आपली मान पुन्हा एकदा उंचावण्यासाठी नारीशक्ती धावून आली. भारताच्या महिला क्रिकेट संघाने (Indian Women Cricket team) मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल दहा वर्षांनंतर सामना जिंकत इतिहास रचला आहे. गेल्या दहा वर्षांत ऑस्ट्रेलियाने एकदाही भारताला जिंकण्याची संधी दिली नव्हती, मात्र यावेळेस भारताच्या रणरागिणींनी त्यांना पहिल्यांदा पराभव स्विकारायला लावला आहे.
महिला क्रिकेटमध्ये, मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा आणि दुसऱ्या डावात २६१ धावा केल्या. तर भारताने पहिल्याच डावात ४०६ धावा ठोकल्या, त्यामुळे दुसऱ्या डावात अवघ्या ७५ धावांचे माफक आव्हान भारताला पूर्ण करायचे होते. केवळ दोन गडी गमावून भारताने ते पूर्ण करत विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ताहिलाने अर्धशतक झळकावले, तर ताहिलाने दुसऱ्या डावातही ७३ धावा करत उत्तम योगदान दिले. या कालावधीत तिने १० चौकार मारले. ऑस्ट्रेलियन संघासाठी एलिस पेरीने ४५ धावांची कामगिरी केली.
भारतासाठी स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी चमकदार कामगिरी केली. भारताकडून पूजा वस्त्राकरने पहिल्या डावात ४ बळी घेतले. तिने १६ षटकात ५३ धावा दिल्या. तर स्नेह राणाने २२.४ षटकात ५६ धावा देत ३ बळी घेतले. दीप्ती शर्माने २ बळी घेतले. स्नेहने दुसऱ्या डावात ४ बळी घेतले. तिने २२ षटकात ६३ धावा दिल्या. राजेश्वर गायकवाड आणि हरमनप्रीतनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले. पूजाला एक विकेट मिळाली. या उत्तम कामगिरीमुळे भारताचा महिलांच्या कसोटी सामन्यात विजय झाला.