नवी दिल्ली: जगातील दिग्गज टेक कंपनी गुगलमध्ये(google) पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या कपातीचे संकट आले आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीला १२००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात होती. आता गुगल आपल्या जाहिरातीच्या सेल्स युनिटमध्ये बदल करत आहे. यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा कपात प्रक्रियेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या डिपार्टमध्ये ३० हजार लोक काम करतात.
सुंदर पिचाईे कपातीची पद्धत चुकीची असल्याचे सांगितले होते
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतेच म्हटले होते की कपातीची प्रक्रिया कंपनीने योग्य पद्धतीने केली नाही. दरम्यान कपात ही कंपनीच्या भविष्याच्या दृष्टीने महत्तवाची असल्याचे म्हटले होते. जर असे केले नसते तर पुढे जाऊन गुगलला खूप दुष्परिणाम भोगावे लागले असते. दरम्यान २०२३च्या सुरूवातीला झालेल्या कपातीनंतर कोणालाही काढण्यात आले नाही.
का होऊ शकते कपात?
गुगल सातत्याने आर्टिफिशियल इंटीलिजेन्समध्ये गुंतवणूक करत आहे. याशिवाय कंपनी मशीन लर्निंगचा वापर अॅड परचेसमध्ये करत आहे. एआयच्या वापरामुळे सगळीकडेच लोकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. जर कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले नाही तर त्यांना दुसऱ्या विभागात शिफ्ट केले जाऊ शकते. गुगलने याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.