Thursday, July 3, 2025

ठाणे शहरात पत्नी, दोन मुलांची निर्घृण हत्या करून फरार झालेला आरोपी जेरबंद

ठाणे शहरात पत्नी, दोन मुलांची निर्घृण हत्या करून फरार झालेला आरोपी जेरबंद

ठाणे : कासारवडवली गाव येथील शिंगे चाळीत राहाणाऱ्या अमित धर्मवीर बागडी (२९) हा आपली पत्नी भावना (२४) आणि अंकुश (८) व खुशी (६) या दोन मुलांची हत्या करून पसार झाला होता. त्याबाबत कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास काल जेरबंद करण्यात पोलीस शोध पथकास यश मिळाले आहे.


अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील व सपोआ (शोध -१) गुन्हे निलेश सोनवणे यांनी गुन्हे शाखेतील घटक ५ वागळे, खंडणी विरोधी पथक, मालमत्ता कक्ष, मध्यवर्ती कक्ष यांचेकडील आठ पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. या तपास पथकांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस पडताळून तांत्रिक तपास करून आरोपीचा मागोवा घेतला असता हा आरोपी हरयाणात पळून गेल्याची शक्यता वर्तवल्याने गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी सदर ठिकाणी सपोनिरी अविनाश महाजन व पोउपनिरी तुषार माने यांची वेगवेगळी दोन पथके तयार करून तात्काळ रवाना केली होती.


गेलेल्या तपास पथकांनी आरोपीस हिसार, राज्य-हरयाणा येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन ठाणे येथे आणले. त्याच्या चौकशीत निष्पन्न झाले की, त्याची बायको दोन मुलांना घेऊन आपल्या भावासोबत ठाणे येथे पळून आली होती. याचा राग आल्याने दोघांमध्ये वाद झाल्यानंतर चिडून बॅटने मारून बायको व मुलांचा खून केला. त्याला आपल्या भावालाही मारायचे होते पण ते त्याला जमले नाही आणि तो तेथून पसारा झाला. या आरोपीला दारूचे व्यसन असून तो बिल्डिंग बांधकामामध्ये बिगारीचे काम करत होता.

Comments
Add Comment