मुंबई : मुंबईच्या(mumbai) हवेच्या गुणवत्ता श्रेणीत मागील ४८ तासात घसरण झाली आहे. मागील २४ तासांत मुंबईतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची सरासरी ही १८९ वर होती. गुरुवार २१ डिसेंबर रोजी मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १५७ वर पोहचला होता. मागील अनेक दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. परिणामी त्याचा विपरित परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे.
दरम्यान, मुंबईसोबतच नवी मुंबईच्या हवेची देखील गुणवत्ता खालावत चालल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नवी मुंबईतील हवेचा एक्युआय मागील चोवीस तासांत २०१ वर जात वाईट श्रेणीत गेला आहे. मुंबईसह पुण्याच्या हवेतही बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. कारण पुण्याच्या प्रदुषणातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्याच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा २११ वर पोहचला आहे. ओ३ आणि पीएम २.५ पोल्युटंटचे प्रमाण अधिक आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून त्याचा आरोग्यावरही परिणाम दिसू लागले आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली होती. मात्र, नियमावली धाब्यावर बसवल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळाले. अशातच, मुंबईत शेकोटीवर बंदी घालण्यात आली असून पालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊले उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर केली गेली होती.
अशी होती पालिकेची नियमावली
मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ठिकणी १५ दिवसांत प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले होते. जर या नियमांचे पालन केले नाही तर जागच्या जागी ‘स्टॉप वर्क’ नोटीस देण्याचे निर्देशही दिले होते. रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना हिवाळ्यात सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे.
धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान ४-५ वेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अॅण्टी स्मॉग मशीन लावाव्या लागतील. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. सर्व २४ वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून गस्त घालण्यात येईल.
पण हे नियम देऊनही मुंबईच्या हवेत पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. दरम्यान जर या नियमांचे पालन केले नाही, तर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे आता पालिका कोणती कठोर पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.