नागपूर : राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये (Government Jobs) सुरू असलेल्या कंत्राटीकरणावर (contract recruitment) तरुणांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. तरुणांचा रोष टाळण्यासाठी आता आरोग्य विभागात होणारी कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे.
आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्यात लागोपाठ हजारो कोटींच्या सेवा ठेकेदारांमार्फत घेण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. यापैकी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी काढलेली निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. वार्षिक ६३८ कोटींची ही निविदा होती. याद्वारे ५ वर्षांसाठी सुमारे ३२०० कोटी रुपये ठेकेदाराला दिले जाणार होते. ३० ऑक्टोबर रोजी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
काही महिन्यांपूर्वी कंत्राटी नोकर भरती करण्याचा आदेश काढण्यात आला होता. यामध्ये काही महत्त्वाच्या शासकीय पदांचाही समावेश होता. राज्यातील तरुणांसह विरोधी पक्षांनी सरकारला या मुद्यावर धारेवर धरले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय मागे घेतला. कंत्राटी भरती ही आधीच्या सरकारचे पाप असून त्याचे ओझे आम्ही का उचलावे, अशी टीकाही त्यांनी केली होती.