नवी दिल्ली: वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतासाठी वनडे विश्वचषक २०२३मध्ये हिरो ठरला होता. शमी या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. आता विश्वचषकात शानदार कामगिरी केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की बीसीसीआयने स्पोर्ट्स मिनिस्ट्रीे शमीच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्काराच्या यादीत सामील करण्याबाबत केली आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा भारतातील दुसरा मोठा पुरस्कार आहे.
मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड आणि अर्जुन अवॉर्डसह या वर्षाच्या क्रीडा पुरस्कारावर विचार करण्यासाठी १२ सदस्यीय समिती बनवली आहे. याचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एएम खानविलकर करत आहेत. याशिवाय या समितीमध्ये एकूण ६ सदस्य आणखी असतील जे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील.
विश्वचषकात दमदार कामगिरी
विश्वचषक २०२३मध्ये शमीने ७ सामन्यांत १०.७१च्या सरासरीने २४ विकेट मिळवले होते. जे आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट होत्या. विश्वचषकाच्या सुरूवातीचे चार सामने शमी खेळला नव्हता. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने शमीला न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. शमी विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याने विश्वचषकात सर्वात वेगवान ५० विकेट घेण्याचाही रेकॉर्ड केला होता.