
मराठा आरक्षण, संजय राऊत, आदित्य ठाकरे, रोहित पवार, लव्ह जिहाद आदी मुद्द्यांवर भाजप आमदार नितेश राणे कडाडले
नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation), संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), रोहित पवार (Rohit Pawar), लव्ह जिहाद (Love Jihad) आदी मुद्द्यांवर भाष्य केले. '३२ वर्षांच्या युवकाला हे सरकार घाबरत असल्याचा दावा आदित्य ठाकरे करतात. मग, त्यांनी हिंमत असेल तर एकटे यावे. त्यांचे लग्नाचे वय झाले असून आता त्यांनी वडिलांना सोबत घेऊन फिरू नये', असा टोला आमदार नितेश राणे यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना लगावला.
आदित्य ठाकरे हे लहान बाळ आहे आणि ते घाबरतं म्हणून आज उद्धव ठाकरे सोबत येत आहेत. मी असताना एकटा येतो वडिलांना सोबत आणत नाही. एका बाजूला आदित्य ठाकरे म्हणतात, मी ३२ वर्षांचा मुलगा आहे आणि मला सरकार घाबरतं, मग त्यानं एकट्याने मैदानात यावं. वडिलांना कशाला शेंबूड पुसत पुसत घेऊन येतो? तुझं आता लग्नाचं वय झालंय त्यामुळे सगळीकडे वडिलांना सोबत घेऊन नाही फिरायचं, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
अशा भुंकण्याला आम्ही महत्त्व देत नाही
एका बाजूने समर्थक जिहादी लोकांनी आमच्या हिंदू माताभगिनींना धमक्या द्यायच्या, घाबरवायचं आणि त्यांना केस न देण्यापर्यंत किंवा पोलिसांकडे तक्रार त्या करु शकणार नाहीत, एवढी भीती त्यांच्यामध्ये आणायची, केस समितीपर्यंत पोहचूच नये असे प्रयत्न त्यांचे जिहादी विचारांचे लोक करतात.
दुसर्या बाजूला त्यांच्या समर्थक आमदारांचं म्हणणं आहे की, लव्ह जिहादच्या केसेसच येत नाहीत. पण तुमच्या लोकांनी जर आमच्या माताभगिनींना घाबरवलं नाही, भीती नाही पसरवली तर दिवसा लाखो किंवा हजारोंच्या संख्येने केसेस दाखल होतील. काही पुरावेही आमच्याकडे आहेत. वर्ध्याला झालेली केस माझ्या नजरेसमोर आहे. त्यात माझ्या एका हिंदू भगिनीला तू पोलिसांकडे गेलीस तर तुला जाळून टाकू अशा प्रकारे छळण्याचं आणि घाबरवण्याचं काम झालं आहे. या चॅटचे माझ्याकडे पुरावेही आहेत. एकीकडे महिलांना असं घाबरवायचं आणि दुसरीकडे केसेसच येत नाहीत म्हणून समिती बरखास्त करा असं भुंकायचं, पण अशा भुंकण्याला आम्ही महत्त्व देत नाही, असं नितेश राणे म्हणाले. याचवेळेस महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा आणणार, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.
तुझा मालक लंडनमध्ये इक्बाल मिर्चीबरोबर कांदेपोहे खातो
नवाब मलिकांवर कारवाई करण्यासाठी ज्या प्रकारे पत्र लिहिलं गेलं तसं ते प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत का झालं नाही? या संजय राऊतांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, इक्बाल मिर्ची यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलांचे काही संबंध आहेत की नाही याविषयी चौकशी सुरु आहे. पण लंडनमध्ये उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयदेखील इक्बाल मिर्चीला भेटले होते. तुझा मालक लंडनमध्ये इक्बाल मिर्चीबरोबर कांदेपोहे खातो ते चालतं, मग प्रफुल्लभाईंवर कशाला आरोप करायचा?, असं नितेश राणे म्हणाले.
रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला ऑरी
उद्या नागपुरात निघणार्या रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडवत नितेश राणे म्हणाले, उद्या एवढी मोठी यात्रा निघणार आहे की हॉटेलमधून बाहेर पडायला नको, तिथेच घाबरुन राहिलं पाहिजे. बॉलिवूडमध्ये ऑरी त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार आहे. लोकांनाच माहित नाही तो कशासाठी आहे, कोणाचा आहे. ऑरी तरी फोटो काढून पैसे घेतो, रोहित पवार तर सगळीकडे बिनपैशाचा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ऑरीला आम्ही किती गांभीर्याने घ्यायचं यावर प्रश्नचिन्ह आहे, असं नितेश राणे म्हणाले.
शरद पवार साहेबांच्या गटाला रोहित पवार संपवणार
रोहित पवार म्हणतात माझ्या पाठीशी युवक आहेत. पण त्यांनी मागे वळून पाहिल्यावर आम्हाला दहा लोकही दिसत नाहीत, नेमके कोणते युवक यांच्या पाठीशी आहेत? जसं उबाठाला संजय राऊत आणि आदित्य ठाकरे संपवणार तसं उर्वरित शरद पवार साहेबांच्या गटाला रोहित पवार संपवणार, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
रोहित पवार, उद्धव ठाकरे बिनकामाचे लोक
उद्या आयोजित केलेल्या रोहित पवारांच्या सभेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवर नितेश राणे टीका करताना म्हणाले, सगळे बिनकामाचे लोक एकत्र येणार आहेत. त्यामुळे ग्राऊंड वगैरे बुक करण्यापेक्षा कोणत्या शौचालयात जागा आहे का बघा तिथे सभा उरकून टाका, असं नितेश राणे म्हणाले.
घाण चपलांनीच साफ करायची असते
संजय राऊत यांच्यावर झालेल्या चप्पल हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले,‘घाण चपलांनीच साफ करायची असते. घाणीला हात लावायचो नसतो. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी जे केले त्याचा अभिमान आहे. कारण उठसुठ मोदी साहेब, शहा साहेबांवर, देवेंद्र फडणवीसांवर, राणे साहेबांवर टीका करायची म्हणून ही घाण साफ करण्यासाठी चप्पलच वापरायला लागते आणि ती आमच्या कार्यकर्त्यांनी वापरली आहे, असं नितेश राणे म्हणाले.
मराठा समाज शांतीप्रिय
गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल भिरकविणारे मराठा समाजाचे लोक नाहीत. मराठा समाज शांतताप्रिय आहे. मराठा समाजाने ५८ मोर्चे निघालेत. पण, कुणालाही धक्का लागला नाही. आता, कुठे देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची. कुठे पडळकरांवर हल्ला करायचा. याला मराठा समाज म्हणत नाही. सध्या जे सुरू आहे ते मराठा समाजाला बदनाम करणारे आहे, असं आमदार नितेश राणे म्हणाले.