देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले लेखी उत्तर
नागपूर : काही महिन्यांपूर्वी जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) या गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) उपोषण करत असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला होता. तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जालना हे प्रचंड घडामोडींचं केंद्र बनलं होतं. अख्खा मराठा समाज या घटनेमुळे पेटून उठला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये (Maharashtra Assembly Winter Session 2023) लेखी उत्तर देत लाठीहल्ल्याच्या दिवशी घडलेल्या घटनेचा तपशील सादर केला.
मनोज जरांगे यांनी पहिले उपोषण मागे घेतले त्यावेळेस मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अशी सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतरही जरांगे सातत्याने ही मागणी करत आहेत. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देत कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर या घटनेमध्ये जवळपास ५० आंदोलक जखमी झाले असून ७९ पोलीस जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस सर्वाधिक जखमी झाल्याचे फडणवीस यांच्या निवेदनावरून स्पष्ट झालं आहे. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं त्यांनी लेखी निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले गुन्हे हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत हे या लेखी उत्तरावरून स्पष्ट झालं आहे.
मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने २ जानेवारी पर्यंतची मुदत मागून घेतली आहे. मात्र, जरांगे वारंवार ही मुदत २४ डिसेंबरपर्यंतच असल्याचे सांगत होते. काल त्यांनी यात आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. तर दुसरीकडे राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात सातत्याने वार पलटवार होत असतात. आज लाठीहल्ल्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेले देवेंद्र फडणवीस येत्या दिवसांत या सगळ्या प्रकरणावर काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.