नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने त्याचा जुना सहकारी आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला ‘फिक्सर’ संबोधल्याचा आरोप केला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी सुरतमध्ये लिजेंड लीग क्रिकेट (एलएलसी) एलिमिनेटर सामन्यादरम्यान घडली. ज्यामध्ये गंभीर ‘इंडिया कॅपिटल्स’संघाचे नेतृत्व करत होता. तर श्रीशांत विरोधी संघ गुजरात जायंट्सकडून खेळत होता. सामन्यादरम्यान, जेव्हा श्रीशांत गोलंदाजी करत होता आणि गंभीर फलंदाजी करत होता, तेव्हा षटकाच्या शेवटी दोघेही एकमेकांशी वाद घालताना दिसले.
सामन्यानंतर श्रीशांतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, ‘कोणत्याही प्रकारची चिथावणी न देता, ‘मिस्टर गौतम गंभीर’ माझ्याशी अशा गोष्टी बोलू लागले, ज्या अतिशय असभ्य होत्या आणि त्या बोलल्या जाऊ नयेत. यात माझी कोणतीही चूक नव्हती आणि मला आता काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. थेट क्रिकेट सामन्यादरम्यान त्याने जे सांगितले ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
गुरुवारी सकाळी श्रीसंतने आणखी एक व्हिडिओ जारी केला आणि गंभीरने त्याला काय सांगितले आहे. श्रीशांत म्हणाला, ‘तो मला लाइव्ह टीव्हीवर ‘फिक्सर’,‘ऑफ फिक्सर’ म्हणत राहिला, तरीही मी त्याच्याविरुद्ध एकही वाईट शब्द बोललो नाही. लाइव्ह मॅचदरम्यान तो अशी भाषा वापरत होता. मी फक्त त्याला म्हणालो. ‘हे सगळं काय बोलतोयस?’ ‘त्यानंतर मी पुढे गेलो, तरीही तो असे म्हणत राहिला. मला माहित नाही की त्याने असे का केले? तो षटकाचा शेवट होता आणि त्याने असे का म्हटले हे मला माहीत नाही.’
काय आहे श्रीशांतचा इतिहास?
२०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतवर क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने श्रीसंतची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर बीसीसीआयने श्रीशांतवरील आजीवन बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली, जी सप्टेंबर २०२० मध्ये संपली. श्रीशांतने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ९० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि गंभीर त्यापैकी ४९ सामन्यांचा भाग होता. दोघेही भारताच्या २००७ आणि २०११ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य होते.